Jump to content

पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४)

 तत्त्वतः मोडण्याइतकी बुद्धीची रग आगरकरापर्यंत कोणीच दाखविली नाही ही फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हे दुर्दैव येथेच संपत नाही. व्यवहारांत ते कोणीच पाळीत नसताना व पाळणे शक्य नाही, वेडेपणाचे आहे, हे स्पष्ट दिसत असताना बहुतेक सर्व सुशिक्षित- अशिक्षित हिंदूंमध्ये चातुर्वर्ण्याचा अभिमान मात्र ओतप्रोत भरलेला आहे. वर्णाश्रमस्वराज्यसंघ ही एक विलक्षण चीज आहे. साठी उलटून गेल्यावरही सावकारी किंवा व्यापार करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, चातुर्वर्ण्याचा अभिमान सांगताना पाहिले म्हणजे ती चीज खरोखर पहावीशी वाटते. वर्ण व आश्रम या दोहोची कल्पना यांना नसली पाहिजे किंवा हे लोक ढोंगी, लुच्चे असले पाहिजेत, असे प्रथम मनात येते. पण आपली मते पारखून घेऊन ती आपल्या आचरणाशी विसंगत नाहीतना, हे पाहणे हजारांत एकही मनुष्य करीत नसतो, हे ध्यानात आले म्हणजे तो विचार मागे पडतो.
 पण चातुर्वर्ण्याचा हा भ्रम जितक्या लवकर जाईल, तितके समाजाच्या हिताचे आहे. प्रत्येकाच्या गुणविकासाला पूर्ण संधी मिळून कुजत पडलेल्या व पाडलेल्या अनेक जातीचे कर्तृत्व वाढीस लागेल व या मृतप्राय झालेल्या सनातन पुरुषाच्या अंगी थोडे तरी चैतन्य त्यामुळे खेळू लागेल.