पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२०)

 अनेक पिढ्या असे करीत राहिले तर एकच निवडलेला गुण शुद्ध होत जाऊन जास्त प्रबळ होत जाईल असे म्हणणे असेल तर तेही खरे नाही सर्वसामान्य कर्तृत्व वाढत जाईल; पण अमुकच एक गुण वाढत जाईल, हे इतिहासावरून दिसत नाही. ब्राह्मणांच्या कर्तृत्वासंबंधी वर सांगितलेच आहे. अनेक शतकांच्या शुद्धतेने बुद्धी हा एकच गुण शुद्ध झाला असे नसून सर्व कर्तृत्वच वाढले असे दिसते. यावरून वर्णाप्रमाणे श्रमविभाग करणे अत्यंत चुकीचे असून प्रत्येकाला सर्व क्षेत्रे मोकळी ठेवली पाहिजेत, या विधानाबद्दल शंका राहीलसे वाटत नाही.
 एका वेळेला ज्यांच्यांत मुळीच गुण दिसत नाहीत, जे आरब, तार्तार, धनगर यांच्यासारखे अगदी हीन असतात, त्यांच्यांत पुढें कधीही उत्तम गुणांची पैदास होणार नाही, ते उच्च पदाला चढू शकणार नाहीत, म्हणून त्यांना संधी देण्याचे मुळीच कारण नाही, ही जी चातुर्वर्ण्याच्या बुडाशी असलेली तिसरी कल्पना ती इतिहासाला संमत नाही, हे वर आपण पाहिलेच आहे. आता थोडे बायॉलजीत शिरू.
 पित्याप्रमाणेच पुत्र होतो हे जरी सामान्यतः खरे असले तरी पिता- पुत्रांत, किंवा एकाच पित्याच्या अनेक पुत्रांत जमीनअस्मानाचे अंतर असू शकते, हेही खरे आहे. हे अंतर- हा फरक का पडत जातो, याचा विचार करून शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे दिली आहेत.
 (१) परिस्थिति- दोन सख्खे भाऊ, इतकेच नव्हे तर जुळे भाऊही जर भिन्न परिस्थितीत वाढले तर त्यांच्यांत वाटेल तितका फरक पडू शकतो, हे म्यूलर, न्यूमन, वगैरे 'जुळ्याच्या' अभ्यासकांनी सांगितले आहे. (२) संकराने फरक पडतो हे सर्वमान्य आहे. (३) ज्या जीवन गोलकापासून एका पुत्राचा जन्म झाला, त्या जीवन गोलकाच्या रचनेतच एकाद वेळी फरक होऊन दुसऱ्या पुत्राचे गुणधर्म बदलतात. अशी ही तीन कारणे झाली. याहून निराळे व चौथे कारणही शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. व ते (४) म्हणजे जीवन- गोलकांतच अजिबात फरक पडणे हे होय. काहीएक ज्ञात कारण नसताना असे फरक पडतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. फरकांचे वरील तिन्ही प्रकार सांगून Gene Mutation नांवाचा चौथा प्रकार सांगताना सिनॉट अँड्डन आपल्या Principles of Genetics या पुस्तकांत म्हणतात-