पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४)

 मानवांतील जाती निसर्गजन्यच आहेत हे रा. गो. म. जोशी यांचे मत क्षणभर खरे मानले तरीही त्या जातीची व्यवस्था मनुष्यकृत असल्यामुळे वरील तिन्ही गोष्टी गृहीत धराव्याच लागतात. ब्राह्मणाचे उद्योग दुसऱ्या कोणीही करावयाचे नाहीत, असा निर्बंध असल्यामुळे विद्यावृद्धीचे कार्य ब्राह्मण शतकानुशतके सारख्याच जोमाने व यशाने करीत राहील असे गृहीत धरले असलेच पाहिजे. हीच स्थिती इतरांची. त्यामुळे वरील तीन गोष्टी गृहीत धरल्यावांचून चातुर्वर्ण्याची कल्पनाच अशक्य आहे.
 गृहीत धरलेल्या या तीन गोष्टींपैकी प्रत्येक गोष्ट खोटी आहे.
 हिंदुस्थानचाच इतिहास पाहिला, तर असे स्पष्ट दिसून येते की महाराष्ट्र, मद्रास, कनोज हे दोनतीन प्रांत सोडले तर इतर बहुतेक प्रांतात ब्राह्मण हा फार हीन व आपली विद्यावृद्धीची जबाबदारी पार पाडण्यास सर्वस्वी नालायक असाच झालेला आहे. महाराष्ट्र व रजपुताना यांखेरीज अन्य प्रांतातले क्षत्रिय आपली स्वसंरक्षणाची जबाबदारी गेली पाच सातशे वर्षे पार पाडू शकत नाहीत हे तितकेच स्पष्ट आहे, व या दोन प्रांतानाही पूर्ण यश आलेले नाही ते नाहीच. खुद्द महाराष्ट्रातला वणिग्वर्ग कोणच्याही कारणाने का होईना नष्ट झालेला असल्यामुळे व इतरांनी ते कार्य करावयाचे नाही, असा निर्बंध असल्यामुळे येथील लक्ष्मी धुऊन गेली आहे. यावरून असे दिसते की एखादा वर्ण शतकानुशतके एक विशिष्ट जबाबदारी पार पाडण्यास समर्थ राहील, असे मानून त्याच्यावर ते कार्य सोपविणे समाजाला फार घातुक आहे.
 चातुर्वर्ण्यरचनेतला हा दोष तत्त्वतः नव्हे तरी निदान व्यवहारापुरता तरी ओळखून महाराष्ट्रांतील लोकांनी ज्याला वाटेल त्याने तलवार उचलावी व लागेल त्याने परमार्थाचे अध्ययन अध्यापन करावे अशी प्रथा पाडली व त्यामुळेच सर्व जातीतील कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला वाव मिळून महाराष्ट्र तरला. हीच दृष्टी वाणिज्याबद्दल ठेवून या बाबतीतही मराठ्यांनी मनुस्मृतीला जरा बाजूला ठेवली असती तर महाराष्ट्र निर्धन झाला नसता. मोठमोठे सावकार महाराष्ट्रात होऊन गेले; पण वाणिज्याच्या सर्व शाखा त्यांनी व्यापल्या नाहीत एवढे खरे.
 वंशधर्म किंवा जातीधर्म शाश्वत टिकून राहातात, हे मत किती भ्रामक