पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


समाज-रचनेत आनुवंशाचे महत्त्व.


 आफ्रिकेतील शिद्दी, निग्रो किंवा हिंदुस्थानांतील कातकरी, वंजारी हा लेनिन्, रुसो, नेहरू, बोस यांच्या बरोबरीचा आहे व त्याची शिद्दीण, निग्रीण, कातकरीण किंवा वंजारीण ही मॅडम कुरी, ग्रेटा गार्बो, अहल्याबाई किंवा नूरजहान यांच्या बरोबरीची आहे असे जगातील एका पंथाचे मत आहे. त्या पंथाच्या प्रणेत्यांच्या डोळ्यांपुढे कदाचित ही उदाहरणे नसतील, असती तर कदाचित् समतावाद त्यांनी सांगितला नसता. त्यांच्या अनुयायांनी त्या समतावादाची अंमलबजावणी करताना मूलतत्त्वांना काही मुरडी घातल्या असतील हे सगळे जरी खरे असले तरी त्या पंथाचे शुद्ध तत्त्वज्ञान जर घेतले तर वरील विधानाप्रत त्यांना घसरावे लागेल यात शंकाच नाही. सर्व मानव, कोणाच्याही प्रांतांतला वंशातला कुलातला स्थितीतला कोणचाही मनुष्य म्हटला की तो येथून तेथून मूल गुणांनी सारखाच असतो. भिन्न परिस्थतीत सापडल्यानेच त्याच्यात उच्चनीच्चता निर्माण होते, असे या पंथाचे मत आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतून हे समतेचे तत्त्व निघाले. थोड्या निराळ्या स्वरूपात अलिकडच्या काही पंडितांनी तेच सांगितले व त्या तत्त्वावर समाजरचना करण्याचा आज कोठे कोठे जारीने प्रयत्न सुरू आहे.
 याच्या अगदी थेट उलट टोकाला जाणारा दुसरा एक पंथ आहे. कृष्ण मागे एकदा मोठा होऊन गेला म्हणून त्याच्या कुळांत आज कितीही शेळपट, अजागळ मनुष्य झाला असला तरी तो श्रेष्ठ, कितीही हीन कर्म करीत असला तरी ब्राह्मण कुलात देह जन्मला म्हणूनच केवळ तो मनुष्य वंद्य व आपल्या पराक्रमाने श्रेष्ठपद मिळविणारे महादजी, मल्हारराव इतकेच काय पण शिवाजीसुद्धा (काहींच्या मते) हीन जातीत जन्मले म्हणून तो हीन, असे या पक्षाचे म्हणणे आहे. या तऱ्हेचे तत्त्वज्ञान आज हिंदुस्थानात जारी आहे. मोठ्या जातीत जन्मलेला तो मोठा, लहान जातीत जन्मलेला तो लहान, या तत्त्वावर ही समाजरचना आहे. या तत्त्वाचा प्रणेता मनु होय.
 कोठूनही कोणचाही मनुष्य उचलून घेतला तरी त्याच्या अंगी सर्व गुण सुप्त स्थितीत खास असणारच; व संधी मिळताच तो मनुष्य कोणत्याही क्षेत्रात