पान:विचार सौंदर्य.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ 

विचार सौंदर्य


तादात्म्यानें तरी आनंद कां होतो असे विचारलें तर त्याचेंहि उत्तर रसाविषयीं दिलें तेंच होय. रस व अलंकार यांच्या स्वरूपांत वास्तविक फरक इतकाच कीं रसाचे स्थायीभाव जीवसृष्टीच्या भावनांवर अधिष्ठित असतात व अलंकाराचे स्थायीभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित होऊं शकतात. स्त्रीला लतेची उपमा दिली असतां आनंद होण्याचें कारण हें कीं, समगुण अशा दोन पदार्थाचा अनुभव मनाला एकदम घेतां येतो व हीच गोष्ट समगुण अशा जितक्या अधिक पदार्थीविषयीं एकदम घडेल तितका आनंद वाटेल. या आनंदानें एक प्रकारची तल्लीनता येते व तो आनंद फारच उत्कट झाला तर त्यापासून समाधान लाभूं शकेल. या दृष्टीने पाहतां 'खरी सविकल्प समाधि उत्पन्न करूं शकतें तें वाङ्मय' अशी नवीन व्याख्या मीं बनविली आहे."

 ही उपपत्ति मला मान्य नसली तरी तिनें मराठी साहित्यचर्चात्मक विचारांत चांगली भर घातली आहे व विचारांना चालना दिली आहे हें मी आनंदानें कबूल करतों. पूर्वी कवीची किंवा रसिकाची स्तुति करावयाची झाली म्हणजे विषयाशी तादात्म्य पावण्याची भाषा आपण ऐकत होतों. कवि विषयाशी तद्रूप होतो व त्याच्या भावना अनावर झाल्यामुळे कारंजाच्या फवाऱ्यांप्रमाणे त्या काव्यरूपाने बाहेर पडतात अशी भाषा पूर्वी ऐकूं यावयाची (व अजूनहि येतेच आहे !) ' Poetry is the spontaneous overflow of power- ful feelings' हें वर्डस्वर्थचें वाक्यहि अशा संदर्भात कानांवर आदळावयाचेंच. पण काव्य करतांना कवि मूलभूत भावनांना पूर्णपणें वश झालेला नसतो तर तो शान्त झाल्यावर पुनः स्मृतीच्या व कल्पनेच्या साहाय्यानें पूर्वीच्या भावनांना एक प्रकारें जागृत करीत असतो व अशा छायात्मक भावनांचा क्षोभ एक प्रकारच्या मनःशान्तीच्या अधिष्ठानावर होऊन त्या शान्तिसागरांत छायात्मक भावनांचा कल्लोळ उत्पन्न झाल्यावर काव्यप्रसव होतो असें वर्ड्स्वर्थचें खरें म्हणणें होतें तें कानांवर सहसा येत नाहीं. योगांतील समाधि व हें कलाविषयक तादात्म्य यांतील साम्यामुळे या कलाविषयक तादात्म्याला समाधिविषयक पूज्यभावाचा फायदा मिळून तें कलाविषयक टीकावाङ्मयांत वेदवाक्या- प्रमाणे सादर स्वीकारणीय ठरलें. पण केळकरांची उपपत्ति प्रत्यक्षतः रसिकांच्या मनःस्थितीसंबंधी असली व कवीच्या मनःस्थितीचा विचार त्यांत अप्रत्यक्ष असला तरी या दोन मनःस्थितींचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असल्यामुळे