पान:विचार सौंदर्य.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

३१


घेऊं शकतात, पण तें सदोष आहे हें ते ओळखून असतात. रसास्वाद किंवा कलाविशिष्ट आनंद हाच हेतु किंवा हेंच फळ म्हटले तरी रस किंवा हा आनंद 'शुद्ध' व औचित्ययुक्त असलाच पाहिजे असे त्यांचें म्हणणें आहे. परिपूर्ण व ध्येयात्मक आनंदाच्या दृष्टीनें तरी त्यांचें हें म्हणणें मान्य करण्याशिवाय कोणालाहि गत्यंतर नाहीं.

 आतां सुंदर वाङ्मयापासून मनाला आनंद कां व कसा होतो याविषयीं केळकरांनी जी 'सविकल्प समाधीची' उपपत्ति बडोदें येथील अध्यक्षीय व्याख्यानांत प्रथम विदग्धसभेपुढे मांडिली ती त्यांच्याच शब्दांत सांगून त्यांतील गुणदोषांकडे मागून वळतों. केळकर म्हणतात:-

 " आपली तर भूमिका सोडावयाची नाहीं, पण बसल्या बैठकीत इतर भूमिकांचाहि अनुभवानंद सेवावयाचा, ही गोष्ट प्रतिभाच घडवूं शकते. आपण नवरसांचेंच उदाहरण घेऊं. रसपूर्ण असें काव्य वाचतांना जो आनंद होतो तो आत्मौपम्यबुद्धीमुळेच. कोणत्याहि रसाचा स्थायिभाव क्षणभर दुसऱ्याचा घेऊन आपलासा केल्याशिवाय रस-प्रतीति होत नाहीं. प्रत्यक्ष आपली मुलगी सासरीं चालली असतां डोळ्यांतून पाणी गाळीत जे शब्द आपण बोलतों ते आपणांला काव्य नव्हे. तो आत्मभूमिकेवरचा एकेरी अनुभव. पण तेंच शाकुन्तलाच्या चौथ्या अंकांतील कण्वावरचा कन्याविरह-प्रसंग वाचीत असतां डोळ्यांतून पाणी गाळीत जे शब्द आपण वाचतों ते मात्र आपणांला काव्य किंवा वाङ्मय. कारण, येथें एकाऐवज दोन भूमिका होतात. वाचक आपली भूमिका न सोडतां मनानें दुसऱ्या भूमिकेवर संक्रमण करतो व प्रतिभेनें अनुभव घेतो म्हणून दुःख नसून रसास्वादाचा आनंद होय.'

 या विवेचनानंतर केळकरांनीं रघुवंशांतील व मुक्तेश्वराच्या भारतांतील उदाहरणे देऊन आपले म्हणणें विशद केले आहे आणि अखेरीस रसांप्रमाणेंच अलंकारांना आपल्या सविकल्प समाधीच्या उपपत्तीच्या चौकटींत बसविण्याचा प्रयत्न केला आहे. हा त्यांचा प्रयत्न मला थोडासा अयशस्वी वाटतो. पण मतभेद दर्शविण्यापूर्वी त्यांचें म्हणणें त्यांच्याच शब्दांत सांगतों. ते म्हणतात:- " बहुतेक अलंकार हे उपमा व रूपक यांच्या निरनिराळ्या परीच आहेत. उपमा व रूपक या दोहोंत पूर्ण किंवा ईषत् - तादात्म्य असा फरक असला तरी एकरूपताप्रतिपादन हाच दोहोंचा मुख्य उपयोग आहे. या