पान:विचार सौंदर्य.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५

साहित्य विषयक प्रश्न


भवन्ति ' या न्यायानें ते जुने शब्द ठेवण्यास तयार आहेत.पद्य व काव्य यांमध्ये भेद आहे तो दाखवून काव्याचें काव्यत्व भावना-प्रवर्तनामध्ये आहे हे त्यांनीं पुढील उदाहरणानें स्पष्ट केले आहे. "बाणभट्टाची कादंबरी गद्यरूप असली तरी तें काव्यच होय व राजतरंगिणी पद्यमय असली तरी तें गद्यच होय. इंग्रजीतहि कार्लाइल व इमर्सन यांचे लेख गद्यरूप असले तरी तें काव्यच होय व वर्ड्स्वर्थ यांची कविता पद्यरूप असली तरी तें गद्यच होय. माझ्या मतें गद्यपद्यांची बाह्यलक्षणावलंबी भाषा सोडून द्यावी. बोधप्रधान व रसप्रधान असे दोन प्रकार मानावेत व 'गद्य' आणि 'काव्य ' असा भेद न करितां 'शास्त्रीय वाङ्मय' आणि 'विदग्ध वाङ्मय' असा भेद करावा. पण केळकर म्हणतात त्याप्रमाणें 'शब्दसंकेत हा दुस्तर आहे व तो पाळलाच पाहिजे !

 खऱ्या काव्याला छंद,यमकें,अलंकार,वगैरेंची आवश्यकता नाहीं हें केळकर तत्त्वतः कबूल करतात. पण लगेच मागच्या दरवाजानें या सर्वाना ते आवश्यक अंगाच्या योग्यतेला नेऊन बसवितात. उदाहरणार्थ, रस हा काव्याचा आत्मा असेल " असे अर्धवट कबूल करून लगेच ते अलंकृत भाषा हा त्या रसरूपी आत्म्याचा निदान देह होय " असे मानण्यास आपणांस सांगतात. दुसऱ्या एका ठिकाणीं ते म्हणतात, “अलंकार,वक्रोक्ति, व्यंग्योक्ति, हाहि काव्याचा आत्मा नव्हे असें म्हणणारे लोक संकुचित दृष्टीचे आहेत. " " रसोत्कर्ष होण्याला स्वभावोक्ति पुरी पडूं शकेल, पण ती नेहमींच पुरी पडते असें नाहीं. " यमकें हीं आवश्यक नसतील असें कबूल करून पुनः त्यांच्या गौरवार्थ ते म्हणतात कीं, “ यमकानें नुसता शब्दच नव्हे तर कल्पनाहि सुचतात." त्यांचें हें सर्व म्हणणें खरें आहे आणि काव्या- काव्यामध्यें भेद करून तारतम्य ठरवलें म्हणजे पुष्कळसा वाद मिटण्यासारखा आहे. भावनाविलासाप्रमाणें कल्पनाविलासांना व विचारविलासांना गौरवाचें स्थान देण्यास माझी हरकत नाहीं. पण तर-तम-भाव ठरवावयाचा म्हटला म्हणजे भावनाविलासांना उच्चतम स्थान द्यावे लागेल असे मला वाटतें आणि भावनाविलासात्मक उच्चतम काव्यांचा आत्मा अलंकार नव्हे, किंवा वक्रोक्ति नव्हे किंवा व्यंग्योक्तिहि नव्हे हें म्हणणे मान्य करावें लागेल. भावना- विलासात्मक उच्चतम काव्यांचा 'देह ' म्हणून देखील अलंकारादिकांना मान्यता देण्यास मी तयार नाहीं. कारण 'देह' म्हणणें म्हणजे ते आवश्यक