पान:विचार सौंदर्य.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्यविषयक प्रश्न

१७

लोकमान्य टिळक, भारताचार्य चिंतामणराव वैद्य, वगैरे अधिक विद्वान् किंवा बहुश्रुत असतील; कवि या दृष्टीमें किंवा नाटककार किंवा निबंधलेखक किंवा लघुकथालेखक या नात्यानें त्यांच्याहून अधिक योग्यतेचे लोक कांहीं आहेत; पण सुंदर आणि अनेकविध वाङ्मयकलाकृति करून त्यांच्या स्वरूपा- विषयीं, लक्षणांविषयीं वगैरे रसपूर्ण व मार्मिक मीमांसा करणारे आणि सर्वोत अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाङ्मयात्मक रसाची खरी भक्ति करणारे महाराष्ट्रांत किती आहेत ? केळकरांची ही भक्ति त्यांच्या अंगांत इतकी बाणलेली आहे की राजकारणासंबंधीं, समाजकारणासंबंधीं, शिक्षणासंबंधीं किंवा इतर कोणत्याहि विषयासंबंधानें ते विचार करूं लागले किंवा लिहूं बोलूं लागले म्हणजे मूळ प्रसंगाच्या विवेचनाला अनुरूप अशा सात्त्विक संतापादि भावनांवर देखील वाङ्मयात्मक रसास्वाद-लालसेचें प्राबल्य होऊन मूळ भावनेचें रूपांतर होतें. मी काय म्हणतों तें उदाहरणें देऊन स्पष्ट करतों. लोकमान्य टिळक हे राजकीय किंवा सामाजिक प्रतिपक्षावर टीकालेख लिहीत आहेत अशी कल्पना केली तर कोणाची दयामाया न ठेवतां - ' आडवें आलें तर पोटचें देखील कापले 'पाहिजे' अशा हट्टास पेटून प्रतिपक्षावर लेखनात्मक हल्ला करीत आहेत असा देखावा कल्पनाचक्षूंपुढें दिसेल. पण तशाच परिस्थितींत केळकर लिहीत आहेत अशी कल्पना केली तर प्रतिपक्षावरचा माझा हल्ला जोराचा तर झालाच पाहिजे पण वाङ्मयदृष्ट्या सुंदरहि झाला पाहिजे अशा भावनेनें ते लिहीत आहेत असा देखावा आपणांस दिसेल. आपल्या युक्तिवादाने व प्रहारांनी प्रतिपक्षी चीत झाला पाहिजे हा टिळकांचा मुख्य प्रश्न व त्याला चीत केलें असें मनाला वाटले म्हणजे ' चीत कसें केलें ' यापेक्षां ' चीत केलें ' यांतच त्यांना अधिक धन्यता वाटावयाची. केळकरांना प्रतिपक्षास चीत करण्यांत अर्थात् आनंद होईलच, पण वाङ्मयदृष्ट्या कशा सुंदर रीतीनें प्रतिपक्षाचा युक्तिवाद उलटविला, कशा चातुर्यानें त्याच्या पेचांतून सुटलों, नाइलाज म्हणून निर्दय- पणा स्वीकारून जीव घेणारा टोला जो लगावला तो किती सफाईनें लगावला, सरकारच्या जबरदस्तीमुळे टीकात्मक लेखन म्हणजे तारेवरचें काम किंवा सुळावरची पोळी अशी स्थिति ओळखून आपण कसें अंग संभाळून व किती खुबीनें वाग्बाणांचे प्रहार केले— या व अशा विचारांपासून उत्पन्न होणाऱ्या वाङ्मयविषयक स्वसामर्थ्यप्रतीतीमुळे त्यांना अधिक आनंद होईल, व आपल्या
 वि. सौं....२