पान:विचार सौंदर्य.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकर व कांहीं साहित्यविषयक प्रश्न



 कित्येक लोक क्रिकेट, टेनीस वगैरे खेळ उत्तम खेळतात. पण त्यांच्या- पैकीं प्रत्येकाला त्या त्या खेळाविषयीं सशास्त्र, सुंदर व मनोरंजक चर्चा करतां येईल असें नाहीं. शिक्षक, सेनापति, मुत्सद्दी वगैरेंसंबंध असेंच आहे; म्हणजे आपआपली कामें चांगली करणारे जे असतात त्या सर्वांना आपआपल्या कामाची मार्मिक मीमांसा साधेलच असें नाहीं, तर ती त्यांपैकीं कांहींनाच साधते. साहित्यांतील काव्यनाटकादि जे प्रकार आहेत त्यांत नामांकित कामगिरी करून दाखवून पुनः तद्विषयक चर्चा करणें फारच थोड्यांना साधतें कालीदास, भवभूती, ज्ञानदेव, तुकाराम, मोरोपंत, इत्यादिकांनीं रसपूर्ण काव्ये लिहिलीं, पण रसचर्चा त्यांना कांहीं साधली नाहीं असे नव्हे तर त्यांनी या दिशेनें प्रयत्नच केला नाहीं.

 पण ग्रीस देशांतील प्लेटो, किंवा जर्मनींतील गटे, किंवा इंग्लंडमधील वर्डस्वर्थ, शेली, किंवा संस्कृतमधील रसगंगाधरकार जगन्नाथ कवि, किंवा महाराष्ट्रांतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, यांच्यासारखे असे कांहीं थोडे साहित्यभक्त असतात की, त्यांना दोन्ही गोष्टी साधतात. नेपोलिअनप्रमाणे साहित्यक्षेत्रांतील ते पराक्रम करतात; इतकेच नव्हे तर तद्विषयक विवेचनहि ते करतात. किंवा हाच अर्थ निराळ्या तऱ्हेनें सांगावयाचा म्हणजे साहित्य-क्षेत्रांतील ते कर्मयोगी व ज्ञानयोगीहि असतात. नरसिंह चिंतामण केळकर हे अशांपैकींच आहेत.

 यापुढे जाऊन मला असेंहि म्हणावेंसें वाटतें कीं, वाङ्मयक्षेत्रांतील ते खरे ' भक्तियोगी ' हि आहेत. ईश्वरविषयक भक्तीच्या बाबतीत त्यांना मागें टाकणारे महाराष्ट्रांत आज पुष्कळ लोक सांपडतील; पण वाङ्मयविषयक भक्तीच्या बाबतींत त्यांची बरोबरी करणारा श्री. कृ. कोल्हटकरांशिवाय मला कोणी दिसत नाहीं, — आतांपर्यंत तरी कोणी झालेला नाहीं, पुढें कोणीहि होणार नाहीं असें कोण कशाला म्हणेल?