१३
निश्चितता आली आहे, पण अंतःसृष्टि ढांसळत चालली आहे. आणि
अतिशयोक्ति करून बोलायचें म्हणजे तेथें बेबंदशाही किंवा अराजकता
माजूं पाहते आहे. जगाचा आपणांला अर्थ कळेनासा झाला आहे; अज्ञात
लिपींत व भाषेंत लिहिलेल्या सुप्रसिद्ध काव्याप्रमाणे जग हें आपणांस एका
अर्थी सार्थ व रम्य असावेंसें वाटतें, पण हा अर्थ व हें रम्यत्व हीं अनुभवाला
तर पटत नाहींत, तेव्हां या विश्वात्मक ग्रंथाकडे आपण केवळ साश्चर्य व
कुतूहलयुक्त दृष्टीनें पाहतों, पण त्यापासून समाधान, उत्साह, प्रसन्नता, स्फूर्ति
याचा लाभ मिळत नाहीं. His master's voice ( 'धन्याचा आवाज' )
या नांवाच्या फोनोग्राफच्या जाहिरातींत एक कुत्रा दाखवितात, तो आपल्या
धन्याचा आवाज तर ओळखतो, पण तो कोठून कसा येतो हें त्याला समजत
नाहीं, व खरोखरचा धनी बोलतो आहे कीं हा भ्रम आहे असा त्याला प्रश्न
पडलेला दिसतो, त्याप्रमाणेच आपली स्थिति झाली आहे; म्हणजे जगाकडे
पाहून व त्यांतील ‘ ध्वनि ' ऐकून तो आपणाला ओळखीच्या सारखा तर
वाटतो, जगदीश्वराचा असावा असें तर वाटतें पण निश्चय मात्र कांहीं एक
करवत नाहीं, अशी आपली स्थिति झाली आहे !
अलीकडे धर्माच्या बाबतींत काय किंवा राजकीय व इतर बाबतीत काय,
मतामतांचा गलबला आहे; सर्व कल्पना संशयास्पद झाल्या आहेत;
कोणतीहि गोष्ट अशी नाहीं, कीं तिला जोराचा धक्का मिळालेला नाहीं.
अशा मनःस्थितींत कशाचा विशेष राग-लोभ नसतो, कशाबद्दल विशेष
अगत्य किंवा उत्साह वाटत नाहीं, कांहींहि विशेष आदरणीय व पूज्य
वाटत नाहीं, परंपरेचे संस्कार राहिले आहेत, पण ते होत पुसट चालले आहेत.
नवीन संस्कार कोणते करावयाचे हेंच निश्चित नसल्यामुळे कोणालाहि त्याचें
अगत्य नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अलीकडच्या शास्त्रीय युगांत
बाह्य परिस्थितीमध्ये सापेक्षतः स्थिरता व निश्चितता, पण अंतःसृष्टीमध्यें
अस्थिरता व अराजकता उत्पन्न झाली आहे. अशा मनःस्थितीत कोठल्याहि
क्षेत्रांत मोठा पराक्रम कसा होणार ?
सध्यां आपणाला लहान लहान कर्तव्यें, लहान लहान प्रश्न, लहान लहान सौंदर्यै दिसतात, पण विश्वव्यापक कर्तव्यें, समुद्रगंभीर प्रश्न व विराट्स्वरूपी सौंदर्ये कल्पनेलाहि अगम्य झालीं आहेत; कारण धर्मावरची नव्हे तर नीतीवरची श्रद्धा उडालेली आहे, आधिभौतिक शास्त्रांवरची उडालेली