पान:विचारसौंदर्य.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

समरस झालो तर आनंद होईल. एखाद्या विदूषकाशी किंवा शिखंडीशी समरसत्व पावून होणार नाही. तो देखील होईल; केव्हां ? तर कवीने त्यांचे विनोदाच्या वगैरे द्वारे रम्य स्वभावविशेष दाखविले असतील तेव्हां आणि अशा प्रसंगी जो आनंद होईल तो वर्णनाच्या रीतीची प्रतीति असल्यामुळे किंवा असल्या प्रसंगांत सुप्त गुस असलेल्या रम्यत्वाची प्रतीति असल्यामुळे आनंद होईल. केळकरांचा असाचं अर्थ असेल तर मतभेदच नाही. पण असा अर्थ असावा असे वाटत नाही.
  माझ्या म्हणण्याचा एकंदरीत रोख असा आहे की, वस्तुगत रम्यत्व-उदात्तत्वादि गुणांमध्ये (किवा कांटेकोरपणे बोलावयाचे म्हणजे त्यांच्या प्रतीतींत) आनंददायकत्व आहे व हैं आनंददायकत्व उपरिनिर्दिष्ट अनेक रीतींनी होत असते. या आनंदांत सविकल्प समरसत्व असतेच; पण त्याला भलतेच महत्त्व न देतां वस्तुगत किंवा वर्णनगत रम्यत्वास व इतर कारणांस योग्य महत्त्व दिले जाईल अशी उपपत्ति असेल तरच ती पूर्णपणे मान्य होईल, नाहीतर ती एकांगी, अतएव अमान्य, होईल.
  सौंदर्यविषयक आनंदाची मीमांसा करतांना एका घटकाचा मात्र अवश्यमेव उल्लेख केला पाहिजे. त्याला नांव कांहीं देतां येत नाही, कारण तो अनिर्वचनीय आहे. सौंदर्याची किती जरी मीमांसा केली तरी त्यांत काही तरी अनिर्देश्य असा भाग राहतोच, त्याचप्रमाणे सौंदर्यजन्य आनंदाचेंहि आहे. मनुष्याने पृथक्करण चर्चा करावी, वादविवाद करावा, पण अखेर काव्यादिकांच्या सौंदर्यात व तजन्य आनंदांत काही तरी शब्दातीत व केवळ हृदयसंवेद्य असे. असते हेहि कबूल करावें. एखादी वस्तु किंवा एखादी व्यक्ति आपणांस प्रिय होते व आनंद देते त्यांत काही तरी शब्दांच्या व विचारांच्या कक्षेबाहेरील असा ' आन्तर हेतु ' असतो.

व्यतिषजति पदार्थानान्तरः कोऽपि हेतुः।
न खलु बहिरुपाधीन् प्रीतयः संश्रयन्ते ।।


  हे तत्त्व, पृथक्करणात्मक मीमांसेचा प्रयत्न किंवा तद्विषयक उत्साह कमी होऊ न देतां ध्यानात धरणे आवश्यक आहे. आपल्या अपूर्णावस्थेतलीच अर्थात् ही असमाधानकारक स्थिति आहे. पूर्णावस्थेत पूर्ण ज्ञान होऊन पूर्ण आनंदाचा अनुपम उपभोग घेण्यास सांपडेल; तोपर्यंत आपल्या मीमांसेची मर्यादाओळखलेली बरी.

३७