पान:विचारसौंदर्य.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

व प्रफुल्लित करतात. पण कीर्तनाचे मुख्य काम विद्वान् हरदासालाच केले पाहिजे. उदाहरणार्थ, केळकरांची वरील उपमाच ध्या. साहित्यचर्चा म्हणजे फलाहाराच्या वेळच्या शिळोप्याच्या गप्पा नव्हेत, तर तद्विषयक एक मोठे महत्त्वाचे शास्त्र आहे, ती एक कलाहि आहे; इतकी की कलाकृति जशी व जितकी सुंदर असते तितकी कलाविषयक टीकाहि असू शकते, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा वरील उपमेत सूचित होत नसला तरी पण काव्यचर्चेवरचा पूर्वनिर्दिष्ट आक्षेप वाचून किंवा ऐकून मनांत जो प्रतिकूल ग्रह उत्पन्न झालेला असतो त्याची तीव्रता केळकरांनी दिलेल्या वरच्यासारख्या उपमांनी कमी होत नाही काय ? अर्थात् होतेच. तात्पर्य, तर्कावर अधिष्ठित असलेली केळकरांची वाङ्मयविषयक चर्चा विद्वत्त्व, विवेकित्व, विनो- दित्व इत्यादि बहुमोल आंतर सद्गुणांनी युक्त असल्यामुळे व उपमादि अलंकारांनी सुशोभित असल्यामुळे ती मधुर कलाकृतीप्रमाणे रसिकांस आदरणीय व सेवनीय वाटते यांत नवल नाही.
 असो. एवढी प्रस्तावना करून केळकरांच्या वाङ्मयविषयक चर्चेतील एकेका विषयाकडे आतां मी वळतो.
 वाङ्मयांचा पृथकरणात्मक विचार करू लागल्यावर गद्य व काव्य हा भेद प्रथम ध्यानात येतो. केळकरांनी उजयिनी येथे नुकतेच जे भाषण केले त्यांत या प्रकारांचा भेद दर्शविण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे." माझे लेखन मुख्यतः विवेचनात्मक व तर्कनिष्ठ असते असे मला वाटते. म्हणून मी गद्य-लेखक या सदरां- तच पडेन" असे म्हणून विवेचन व तर्कनिष्ठता हे गद्याचे व्यवच्छेदक विशेष होत हे त्यांनी सुचविले आहे ते बरोबर आहे. गद्य व काव्य हा भेद वृत्तबद्धतेचा अभाव किंवा अस्तित्व या बाह्यलक्षणावर अवलंबून नसून लेखनाच्या परिणामावर अवलंबून आहे हे ते जाणून आहेत. ते सदर व्याख्यानांतच म्हणतात की, " कित्येक लेखक गद्यचं इतकें सरस लिहितात व कित्येक लेखक पद्यच इतकें नीरस लिहितात की संसारांत अनेक वेळां अनुभवाला येते त्याप्रमाणे दादाला अक्का व अक्काला दादा म्हटले तर ते शोभेलहिं." पण जनरूढीला अनुसरून आणि 'प्राधान्येन व्यपदेशाः भवन्ति' या न्यायाने ते जुने शब्द ठेवण्यास तयार आहेत. पद्य व काव्य यांमध्ये भेद आहे तो दाखवून काल्याचे काव्यत्व भावना-प्रवर्तनामध्ये आहे) हे त्यांनी पुढील उदाहरणाने स्पष्ट केले आहे. " बाणभट्टाची कादंबरी गद्यरूप असली तरी ते काव्यच

२०