बरोबरी करणारा श्री. कृ. कोल्हटकरांशिवाय मला कोणी दिसत नाही,आतांपर्यंत
तरी कोणी झालेला नाही, पुढे कोणीहि होणार नाही असे कोण कशाला म्हणेल ?
लोकमान्य टिळक, भारताचार्य चिंतामणराव वैद्य, वगैरे अधिक विद्वान् किंवा
बहुश्रुत असतील; कवि या दृष्टीने किंवा नाटककार किंवा निबंधलेखक किंवा
लघुकथालेखक या नात्याने त्यांच्याहून अधिक योग्यतेचे लोक काही आहेत; पण
सुंदर आणि अनेकविध वाङ्मयकलाकृति करून त्यांच्या स्वरूपाविषयीं, लक्षणां-
विषयीं वगैरे रसपूर्ण व मार्मिक मीमांसा करणारे आणि सर्वात अधिक महत्त्वाची
गोष्ट म्हणजे वाङ्मयात्मक रसाची खरी भक्ति करणारे महाराष्ट्रांत किती आहेत ?
केळकरांची ही भक्ति त्यांच्या अंगांत इतकी बाणलेली आहे की राजकारणासंबंधी,
समाजकारणासंबंधी, शिक्षणासंबंधी किंवा इतर कोणत्याहि विषयासंबंधाने ते विचार करूं
लागले किंवा लिहूं-बोलू लागले म्हणजे मूळ प्रसंगाच्या विवेचनाला अनुरूप अशा
सात्त्विक संतापादि भावनांवर देखील वाङ्मयात्मक रसास्वाद-लालसेचे प्राबल्य होऊन
मूळ भावनेचे रूपान्तर होते. मी काय म्हणतो तें उदाहरणे देऊन स्पष्ट करतो. लोक-
मान्य टिळक हे राजकीय किंवा सामाजिक प्रतिपक्षावर टीकालेख लिहीत आहेत
अशी कल्पना केली तर कोणाची दयामाया न ठेवतां-'आडवे आले तर पोटचे
देखील कापले पाहिजे' अशा हटास पेटून प्रतिपक्षावर लेखनात्मक हल्ला करीत
आहेत असा देखावा कल्पनाच पुढे दिसेल. पण तशाच परिस्थितीत केळकर
लिहीत आहेत अशी कल्पना केली तर प्रतिपक्षावरचा माझा हल्ला जोरांचा तर
झालाच पाहिजे पण वाङ्मयदृष्टया सुंदरहि झाला पाहिजे अशा भावनेने ते लिहीत
आहेत असा देखावा आपणांस दिसेल. आपल्या युक्तिवादाने व महारांनी प्रतिपक्षी
चीत झाला पाहिजे हा टिळकांचा मुख्य प्रश्न व त्याला चीत केले असें मनाला
वाटले म्हणजे 'चीत कसे केले' यापेक्षा 'चीत केले' यांतच त्यांना अधिक
धन्यता वाटावयाची. केळकरांना प्रतिपक्ष्यास चीत करण्यांत अर्थात् आनंद
होईलच, पण वाङ्मयदृष्टया कशा सुंदर रीतीने प्रतिपक्ष्याचा युक्तिवाद उलटविला,
कशा चातुर्याने त्याच्या पेचांतून सुटलों, नाइलाज म्हणून निर्दयपणा स्वीकारून
जीव घेणारा टोला जो लगावला तो किती सफाईने लगावला, सरकारच्या
जबरदस्तीमुळे टीकात्मक लेखन म्हणजे तारेवरचे काम किंवा सुळावरची पोळी
अशी स्थिति ओळखून आपण कसे अंग संभाळून व किती खुबीने वाग्बाणांचे
13