पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कशाच्या बरं असायच्या त्या गप्पा?
 ... कोणीतरी कोणालातरी दगडाला बांधून पत्र पाठवलेले असायचे. किंवा कोणीतरी कुणाचातरी रोज येताना पाठलाग करीत असायचा. मग अय्या, इश्श, वगैरे, आम्ही वेगळ्या वळणाने वाढू लागलो. आणि राजूच्या घराभोवतीचे धुके अधिकच गूढ होऊ लागले.
 मला राजूबद्दल एक विचित्र ओढ वाटे. तिला मुली दूर का ठेवतात? तिच्याशी तुटक का वागतात, हे कळत नसे!
 माझं घर काळाच्या वेगाने धावणारं होतं. घरात शेकडोंची ऊठबस असे. स्वैपाकघरात कोणीही जाऊन पाणी पिऊन येई .मला मुलगी म्हणून वेगळ्या रीतीभाती आवर्जून शिकवल्याच नाहीत. त्याचा परिणाम असेल. मी राजूला माझ्या शेजारी जागा देई. पण पठ्ठीनं घरी म्हणून कधी नेलं नाही.
 एक दिवस दुपारी खेळताना राजूचा वेगळेपणा मला जाणवला. मी तिच्या कानांत कुजबुजले. ती दुसऱ्याच क्षणी कावरीबावरी झाली. अनुभवी आणि शहाण्या चिमणीसारखा मी तिला धीर दिला, आणि मधल्या सुटीत दप्तर घेऊन तिला तिच्या घरी नेऊन पोचवले. त्या दिवशी तिचं घर जवळून पाहिलं. तिच्या आईने माझ्या पाठीवरून हात फिरवला. खोबऱ्याचा लाडू खायला दिला, आणि सांगितले राजूशी खेळायला येत जा . मला राजूची आई खूप आवडली. राजलक्ष्मीसारखीच सावळी. पांढऱ्या खड्याची नाकातली चमकी तिला शोभून दिसे.
 एकदा राजू खूप नटूनथटून आली होती. मला खुशीत येऊन तिने सांगितले की तिचे वडील आले आहेत. ही बातमी मी अख्ख्या वर्गात अक्षरशः सगळ्यांना सांगितली. राजूला वडील आहेत हा केवढा दिलासा वाटला होता मला ! आज इतक्या वर्षांनी मला स्वच्छ जाणवतेय ती भावना , जणू माझ्याच माथ्यावरचं मळभ दूर झालं होतं, अन् लख्ख ऊन पडलं होतं. कारण एकदा नव्हे तर चारचारदा पुष्पी , कमळीनं मला बाजूला नेऊन हलक्या आवाजात विचारलं होतं, राजूच्या घरी एक भलामोठा सोनेरी पलंग आहे म्हणे! तू पाहिलास का ग? आणि राजूची आई कशी आहे? खूप नटते म्हणे ! हे विचारताना खाजगी सल्ला दिला होता तिच्याकडे जात जाऊ नकोस . आमच्या घरात मुळीच आवडत नाही.
 राजूचे बाबाही सर्वांच्या बाबांसारखे नाहीत तर पपांसारखे प्रेमळ गृहस्थ होते. वयस्कर , टक्कल असलेले, मोठमोठ्या मिशा . मला राजूने खास जेवायला बोलावले होते. राजूची आई खूप हसरी आणि मनमोकळी बनली होती. राजूच्या बाबांची बदली मुंबई नागपूर लाईनवर झाल्याने ते अधून मधून घरी येत. आई नि बाबा असे दोघेही घरात असल्याने घरही जणू रुणझुणायला लागले होते.



अधुऱ्या स्वप्नांची अक्षयवेल ॥८९॥