पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दिवस जात होते. आम्ही अकरावीला गेलो. अभ्यासात आकंठ वुडालो राजू लागोपाठ चार दिवस आली नाही. म्हणून घरी गेले तर काय? घरावर अवकळा पसरलेली. अम्मी आणि राजूचे डोळे रडून सुकले होते. घरात राजूचे मामामामी आले होते . सामानाची बांधबांध सुरू होती.
 राजूच्या वडिलांची बदली मिलॉन एक्सप्रेसवर झाली होती. अपघातात ते दगावले होते. तब्बल पंधरा दिवसांनी त्यांना बातमी मिळाली होती. ती तिच्या मामाने आणली होती.
 राजूच्या आईचे घर केरळमध्ये आहे . त्रिवेंद्रमजवळच्या लहानशा खेड्यात . तिथल्या घरात तिच्या मावश्या , आज्या, मामा असे सगळे रहातात. खूप मोठा परिवार. घरातल्या मुली लग्नानंतर नवऱ्याकडे जात नाहीत . नवराच अधूनमधून पाहुण्यासारखा येतो. राजूची आई त्रिवेंद्रमच्या एका दवाखान्यात नर्स होती. तिथेच तिची आणि राजूच्या वडलांची ओळख झाली . अम्मीला तिच्या घरातले वातावरण आवडत नसे. ती हुशार होती. डॉक्टरही झाली असती . पण भावाने विरोध केला. शेवंटी ती नर्स झाली . राजूचे बाबा केरळांतलेच. पण जातीने वेगळे . अम्मीला स्वतःच स्वतंत्र घर हवं होतं. खेड्यातल्या घरात मुक्कामाला येणारे मेहुणे , मावसे यांची वर्दळ तिला आवडत नसे. आई वडील, मुले यांचे घर तिला हवं होतं. घरातल्या कुबट वातावरणाला कंटाळून तिने धारवाडच्या भिंती ओलांडल्या . ती राजूच्या बाबांबरोबर मुंबईत आली. पण तिथेही तिच्या स्वप्नांना तडा गेला . मुंबईत राजूच्या वडिलांची पहिली पत्नी व तीन मुले होती. त्यावेळी राजूचे वडील धुळे- चाळीसगाव लाईनीवर कामावर होते. त्यांनी अम्मीला धुळ्याला आणून ठेवले. तिथेच राजूचा जन्म झाला.
 राजूच्या अम्मीला स्वतःचे घर हवे होते. फक्त आपलाच असणारा जोडीदार हवा होता. प्रतिष्ठा हवी होती. पण आयुष्यभर ती एकाकीच राहिली. अफवांना पचवीत राहिली. एकच आशा मनात होती. ती राजूला खूप शिकवणार होती. तिच्यासाठी तिचं हक्काचं घर आणि जोडीदार शोधणार होती. तिला न मिळालेली प्रतिष्ठा राजलक्ष्मीला मिळवून देणार होती. पण त्या आघाताने सारी स्वप्ने पुन्हा एकदा उखडली गेली.
 राजूचे मॅट्रिकचे वर्ष पूर्ण होईपर्यंत तरी धुळ्यात रहावे अशी अम्मीची इच्छा होती. पण मामा कोणाचेच ऐकायला तयार नव्हता.
 राजू वयाच्या पंधराव्या वर्षीच आपल्या आईचं मन कळण्याइतकी प्रौढ झाली . शेवटच्या आमच्या भेटीत राजूने माझे हात हातात घट्ट धरून आश्वासन दिले होते.
 ... मन्नू, त्या घराच्या भिंती मी नक्की फोडून बाहेर येईन आणि तुला पत्र पाठवीन . अगदी दहापंधरा वर्षांनीसुद्धा ! तू उत्तर पाठवशील ना मला? विसरणार

॥ ९० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....