पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाहत्या वाऱ्यासंगे ...


 वाहत्या वाऱ्यासंगे धावणारे मन प्रत्येकाच्या ओंजळीत असतेच, परिस्थिती, पंथ, धर्म, लिंग, देश, जात आदींचे बांध, भिंती घालून आम्ही त्याला पार कोंदटून टाकतो. त्या भिंतींचीही मग सवय होऊन जाते आणि अंधारच उजेड वाटू लागतो. बे एकं बे, बे दुणे चारचा पाढा म्हणण्यात बे दाहे वीसच्या अखेरच्या मुक्कामावर कधी येतो ते कळत नाही. भिरभिरत येऊन माथ्यावर पडणारे लिंबाचे पान, डोळे मिचकावित खुणावणारी फुले, रस्त्यावरून जाणारी तहेतऱ्हेची माणसे... असे कितीतरी. या साऱ्यांकडे आम्ही पाहतो रोबोटच्या नजरेने. यंत्रमानवाच्या निरंग नजरेने.
 पण कधी कधी, अगदी अचानकपणे या भिंतीलाही एखादी चीर पडते. निमित्त काही का असेना पण चिरीतून उजेडाची तिरीप थेट आता येते. नि मन त्या इवल्याशा फटीतून निसटते ते थेट आभाळापर्यंत जाऊन पोचते. वाऱ्याचे बोट धरून, घरादारात... पानाफुलात... डोंगरदयात... नदीतळ्यात अगदी मन मानेल तसे मुक्तपणे भटकत रहाते. अगदी तनामनातही घुसते. इथे ... तिथे डोकावत अनुभवांचे रंगविभोर क्षण ओंजळीत साठवून ठेवते.
 आणि मग कधी कधी, शब्दांना किरणांचे मृद्गंध लखडून जातात.
 ... मन केवढं केवढं
 जसा खाकसाचा दाना
 मन एवढं एवढं
 त्यात आभाय माईना ...
 दिवसरात्र मातीत घाम गाळून संसार सावरणाऱ्या मनातलं गुज जात्याच्या कानात मोकळं करणाऱ्या, जगाच्या दृष्टीने अडाणी-निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईच्या शब्दात उगवाईच्या दिशा रुणझुणू लागतात. आभाळ, घरटं, जातं, तवा यांनाही अमरत्व लाभते.