पान:वाटचाल (Vatchal).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेतु माधवराव पगडी : ११५

 सेतु माधवरावांनी फारशी साधनांचा मराठीतून अनुवाद हे एक महत्त्वाचे कार्य अंगावर घेतले. एकटे पाणीपत प्रकरण जरी लक्षात घेतले तर पाणीपताशी संबंधित असणारी अनेक फारशी साधने सेतु माधवरावांनी मराठीत आणली आहेत.औरंगजेबाचे समकालीन वृत्तांतकार साकी मुस्त्यारखान आणि बाबूराम सक्सेना यांचे लिखाण मराठीत आणले आहे. फारशी साधनांचा हा मराठी अनुवाद आणि सेतु माधवरावांच्या प्रेरणेने इतरांनी फारशी साधनांचे मराठीतून केलेले अनुवाद ही इतिहासाच्या अभ्यासाला मिळालेली एक देणगी आहे. आरंभीच्या काळात ज्या जाणिवा सेतु माधवरावांना नव्हत्या, त्यांची तीव्रता इतिहाससंशोधनात नंतरच्या काळात त्यांना जाणवू लागली. आपण इतिहासात मध्येच कुठेतरी एखाद्या व्यक्तीचे नाव घेतो. या व्यक्तीची संपूर्ण माहिती आपल्यासमोर नसते. उद्या जर एखाद्याने सहजगत्या असा प्रश्न विचारला की, सिद्दी जोहारच्या वेढ्यातून पन्हाळगडाहून महाराज पळाले, या सिद्दी जोहारचे पुढे काय झाले ? किंवा या कर्नूलच्या सुभेदाराचा आधीचा इतिहास कोणता? प्रत्येक व्यक्तीची सर्व उपलब्ध माहिती क्रमाने देणारे चरित्रविषयक टीपण ही एक महत्त्वाची बाब आहे. ज्या स्थळांचे उल्लेख सतत येत राहतात, त्या स्थळांचे तपशीलवार टिपण हा दुसरा भाग आहे. भूगोलाचा आणि इतिहासाचा दर क्षणाला समन्वय हा अजून एक भाग आहे. सेतु माधवरावांनी या दिशेने केलेल्या प्रयत्नांची काही महत्त्वाची फलिते आहेत.
 विजापूरच्या आदिलशाहीत पठाण पार्टी आणि दखणी मुसलमानांची पार्टी यांचा जो संघर्ष चालू होता, त्या संघर्षाचा मराठेशाहीच्या आरंभीच्या काळाशी अनुबंध सेतु माधवरावांच्या या उभे-आडवे धागे शोधण्याच्या धडपडीतून उजेडात आला. पराभूत करणे आणि समाप्त करणे या दोन बाबी वेगवेगळ्या आहेत. मराठ्यांनी आपले शत्रू जिवंत ठेवले, ते कधी समाप्त करण्याचा प्रयत्न केला नाही, ही टीका किती मर्यादेपर्यंत रास्त आहे ; दर क्षणी मराठ्यांची शक्ती किती होती या विषयीचे भानही याच लिखाणातून उदयाला आलेले आहे. सतराशे सातला औरंगजेब वारला आणि मग शाहूची सुटका झाली. या शाहूच्या ताब्यात तत्त्वतः आलेले राज्य आणि व्यवहारत: त्या राज्याची परिस्थिती याची जाणीवच आपणाला फारशी नव्हती. एकेका स्थळाचा इतिहास पाहत पाहत सेतु माधवरावांनी इ. स. १७०८ ते इ. स. १७३० या कालखंडातील मराठा राज्याचे मोठे विदारक वास्तव ठसठशीतपणे आपल्यापुढे प्रथम आणलेले आहे. शाहू आणि पेशवे यांच्या राजकारणाला आकार देणारे हे वास्तव आपण फारसे विचारात घेतलेले नाही.
 या प्रयत्नामधून सेतु माधवरावांनी पहिल्या बाजीरावांविषयी आपला अभ्यास सिद्ध केला या बाजीरावांच्याविषयी आमच्या इतिहाससंशोधकांना अभिमान पुष्कळ. पण या बाजीरावचे एखादे साधार इतिहासप्रमाण चरित्र मात्र अजूनही