कविता'त तुकोबा, आई भेटते. वाचक हळवा होऊन जातो. 'कुळंबिणीची कहाणी' दीर्घ कविता तर इथं छोट्या चणीच्या कविता भेटतात. अल्पाक्षरी कविता म्हणून हिचं लमाण सौंदर्य, बिलोरीपण कोण नाकारेल? यमक, अनुप्रासाची खाण म्हणूनही त्या वेचलेल्या ठरतात. 'अखिल निळे। निखळ तळे। बघून चळे। मन माझे।' अशी चाळवणारी ही कविता. 'भूमीचे मार्दव' म्हणजे कुळंबिणीचीच कहाणी. पण इथं लेकी, सुनांचं हिंदोळ्यावरील अल्लडपण, पहिलं न्हाण, लेकीबाळीच्या साऱ्या खेळीमिळी इथं हसतात, रुसतात. बापा, भावाचा घोर इथं नि नवऱ्याचा, दिराचा झोका-झुलवाही इथं अनुभवायला मिळतो, म्हणूनही या कवितेचं नाव 'सारे रान'.
या साऱ्या रानात तुम्हाला पिके, प्राणी, पक्षी, माती, पाणी, अवजारं, कीटकनाशकं, बियाणं, शेत-शिवाराचं सौंदर्य, अरिष्ट, आत्महत्या, सण, वारी, चैतन्य, दैन्य, भाव, भक्ती सारं मिळून एक कृषिवल संस्कृतीचं गुणगुणतं गाणं ऐकायला मिळतं नि जगण्याची कुणकुण नि शेतकऱ्यांशी निसर्ग व व्यवस्थेने बांधून ठेवलेल्या कुरबुरी. इथली सारी शब्दकळा शेत- शिवारातून जन्मलेली. मेड, भेरी, घरोटं, मीरोग, ढव्ह, बिनगी असे नवे शब्द विदर्भ, मराठवाडी. त्यांचे अर्थ परिशिष्टात दिल्याने संपादकांकडून मोठे साहाय्य होते. 'मी भूमिपुत्र आणि भूमिपिताही। मीच उभा आगडोंब आणि भूमिकन्या सीताही' असं बजावणारी ही कविता शेतकऱ्यांचं सारं कुटुंब चरित्र उभे करते. इथे शेतकऱ्याविषयी कणव नाही पण हलाखीतून हक्कदार बनवण्याचा आग्रह ही कविता धरते. 'मला हवी आहे जमीन काळी काळी' ही तिची मागणी हक्कांची सनद आहे. एक माणूस दुर्बळ कमकुवत नाळाचा। एक माणूस प्रबळ हत्तीच्या बळाचा' म्हणून असलेली सामाजिक विषमता ही कविता अधोरेखित करते.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलावर एक कवितेची प्लेट होती. ती कविता होती रॉबर्ट फ्रॉस्टची.
The woods are lovely dark and deep
but I have promises to keep
and miles to go before I sleep.
शेतकऱ्यांचं जीवन निसर्गानं घन, गंभीर, गर्द करून ठेवलंय. म्हणून मला त्याला त्या अभिशापासून मुक्त करायचं आश्वासन द्यायलाच हवं. ते पाळणं हजारो वर्षांचं ऋण नि प्रवास खरा! पण आज झोपण्यापूर्वी तो मला करायलाच हवा, पाळायलाच हवा!! नेहरू रोज ऑफिसमधून