पान:वनस्पतिविचार.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अगर वॉटरमन ( पाणीवाला ) यांच्या हातून होत नाहीं. तद्वतच प्राण्याच्या शरीराच्या एंजिनांतील आम्हीं (वैद्य, डाक्टर, हकीम वगैरेसुद्धा ) केवळ फायरमेन अगर वाटरमेन आहों, तहान लागली म्हणजे आम्ही या एंजिनांत ( शरीरांत ) पाणी भरतों आणि भूक लागली म्हणजे अन्नरूप कोळसा अगर सरपण भरतों; इतकेच काय ते. याच्या पुढची अक्कल आमच्या ड्रायव्हरने आम्हांस शिकविलीच नाहीं. हा ड्रायव्हर म्हणजे प्राण होय, व त्याची कामें तोच करू जाणे. आता इतके खरे की, रसायनशास्त्ररीत्या पदार्थाचे पृथक्करण करून, वरील प्रकारची अक्कल पैदा करण्याचा आटोकाट प्रयत्न मनुष्याने केलेला आहे, परंतु तो प्रयत्न कितपत फलद्रुप झाला आहे, हे आजमितीस सर्वत्र चांगलेच कळून चुकले आहे. रसायनशास्त्रवेत्ते सांगतात की, हिरा म्हणजे केवळ निर्भेळ स्वच्छ कार्बन म्हणजे जवळ जवळ कोळशासारखा. तथापि कोळशाचा मुबलक पुरवठा असुन आणि हवा तितका कार्बन मिळण्यासारखा असून अद्यापि त्यांनी एकहि 'कोहिनूर' तयार केला नाही, आणि किमयागारांनी सोनेही अद्यापि स्वस्त केलें नाहीं. पाण्याचे पृथक्करण करून ऑक्सिजन ( प्राणवायु ) व हायद्रोजन काढून दाखवितात, आणि ती दोन्हीं मूलतत्त्वे एकत्र करून पाणी बनवितात; परंतु अवर्षण पडल्यास हा रासायनिक प्रयोग कितपत उपयोग पडेल, याची जबरदस्त शंकाच आहे. अंडी, मांस, गहू, तांदूळ, भाजीपाला, फळफळावळ वगैरेंची पृथक्करणे झालेली आहेत; परंतु अद्यापि कोणत्याही रसायनशाळेतून खाद्य, पेय, लेह्यादिकांचा पुरवठा करण्यात येत नाहीं. सारांश प्राणाचे खरे स्वरूप चांगले कळलेले नाहीं. हे कळलेले नसल्यामुळे म्हणा, अगर वस्तुस्थितीच तशी असल्यामुळे म्हणा, चोहीकडे प्राण भरून राहिला असल्यासारखा भास होतो आणि मरण म्हणजे काय, याचा चांगला उलगडा पड़त नाहीं. अखिल वस्तुसमुदायास लागू करण्यासारखे म्हणून उत्पत्ति-स्थिति-लय हे शब्द योजितात आणि त्यांपैकीं सचेतन अगर सजीव समजल्या जाणाऱ्यांसंबंधाने जनन, जीवन आणि मरण हे शब्द वापरतात. उत्पत्तीची मीमांसा करू लागले म्हणजे अखेर तळाशी हाताला कांहींच लागत नाही, आणि अज्ञान कबूल करण्याच्या ऐवजी आपण ' अनादि' शब्दाचा उपयोग करून ज्ञानाचा आविर्भाव आणतो. लयाची मीमांसादेखील अशीच मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबते आणि