पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका जनार्दनी जावई आला
न आला तसाच निगून गेला

 असा या भारुडाचा शेवट होतो. इथं क्रोध अहंकाररूपी जावई, एकनाथांनी प्रतीकात्मकता वापरली आहे. हा जावई जीवरूपी सासूच्या घरी येतो; पण हा असला क्रोध अहंकाररूपी जावयाचं जास्त कोडकौतुक झालं, तर तो इथेच राहील व जीवरूप सासूच्या घरावर कायमचा कब्जा करेल आणि त्याचे अधिपत्य वाढले, तर मग जिवाचं स्वातंत्र्यच हरवेल. आत्मसुखापासून जीव दुरावेल त्यापेक्षा या असल्या जावयाचे लाड करणे न बरे त्याला काहीतरी कारणे सांगून परत पाठवणे योग्य. आत्मसुख अबाधित राखण्यासाठी क्रोध, अहंकार वगैरे विषयवासनांना दूर ठेवणे गरजेचे आहे, तेच नाथांनी या भारुडात सांगितले आहे. अशी भारुडे-कीर्तन वा भजनातून रंगविताना कोणीतरी पुरुषच सासूचे रूप घेतो व मोठ्या ठसक्यात साथीदारांच्या साह्यानं संवादाचा आधार घेत भारूड उभे करतो. त्यामुळे लोकरंजन तर होतेच; पण प्रबोधन होण्यासही मदत होते. सामाजिक वृत्तीदर्शक भारुडामध्ये जागल्या, चोपदार वगैरेंचा समावेश होतो. नाथांच्या भारुडात विलक्षण वैविध्य आहे. 'जागल्या' मधून ते समाजाला जागे करतात. जागल्या म्हणतो

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा।
उजेड पडताना गळा पडेल फासा॥

 हा जागल्या स्वत: जागृत आहे आणि तो लोकांच्यात ज्ञानरूपी जागृती आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या नगरीचे तो वर्णन करतो ती म्हणजे मानवाचा देह आहे. तो म्हणतो,

तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी।
तुमच्या रोजेला दोन लोभिष्ट नारी
त्यांच्या योगे दुःखे नगरात भारी॥

 वासना आणि तृष्णेच्या रूपानं दोन लोभिष्ट नारी तुमच्याभोवती आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दु:ख प्राप्त होत आहे, त्यासाठी
 जुन्या ठेवण्याचा तुम्ही पुर्जा काढा। त्याच्या आधारे बोलेन घडाघडा।

एका जनार्दनी धरा बळकट मेढा।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा॥

 प्रपंच सुखाला शाश्वत सुख मानण्याचा अज्ञानीपणा करू नका. मनुष्याला परमात्मसुखाची गोडी लावण्याचा प्रयत्न या भारुडामधून जागल्या करतो.
 काही दैवी भूमिका व भूत-पिशाच्च विषयाची भारुडेही एकनाथांनी रचली आहेत.


-

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥९६॥