पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फाटकेंच लुगडे तुटकीसी चोळी शिवाया दोरा नाही॥२॥
जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी। वर तेलाची धार नाही॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही॥४॥
सुरतीचे मोती गुळघाव सोने। राज्यात लेणे नाही॥५॥
एका जनार्दनी समरस झाले। तो रस तेथे नाही॥६॥

 विवेक हरवलेला नवऱ्यासंगे घडलेला संसार एकनाथांनी 'दादला' या भारुडात वर्णन कला आहे.
 अविद्यारूपी पार्थिव देहात जर परमेश्वराविषयीचा अंतरीक शुद्धभाव नसेल, तर त्याला काही अर्थ नाही. परमात्म सुखाची गोडी अवीट आहे ती प्रपंचात नाही.
 'जावई' या नात्यावरचे एकनाथांचे भारुडही लोकमानसात लोकप्रिय आहे. खूप दिवसांनी जावई सासुरवाडीला येतो. जावयाचे कौतुक सासुरवाडीला होतेच. इथली सासू थोडी जास्त हुशार आहे. जावई आणि सासू यांच्या संवादातून एकनाथांनी विनोदनिर्मिती केली आहे.

लई दिसानी आला जावईबुवा..
जावयाला करीन म्हणलं पुरणाची पोळी
पण घरात पहाते तर टोपल्यात भाकरी शिळी
आता कशी करायची पोळी...
खरं सांगा, मी काय पोळी करण्याजोगी नव्हती व्हय
लई दिसांनी आले जावईबुवा...
जावयाला घेईन म्हणलं पगडी
पण घरात पहाते तर आमचीच पोरबाळं उघडी नागडी
आता कशी करायची पगडी?
खरं सांगा, मी काय पगडी करण्याजोगी नव्हती व्हय
लई दिसांनी आले जावईबुवा...
जावयाला घेईन म्हणलं कडं
पर अवचित निघालं सोनाराचं मढं
आता कसं करायचं कडं

 इथं जावयाला सासूकडून काही तरी चीजवस्तू मिळेल, चांगलंचुंगल खायला मिळेल, अशी इच्छा असते आणि हुशार सासू काही ना काही सांगून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न करते.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ९५॥ .