पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आले आहेच.
 आंधळ्यामुखी भारूड वर्णताना एकनाथ म्हणतात,

पूर्वजन्मी पाप केले। ते अधिक विस्तारिले।
विषयसुख नाशिवंत। सेविता तिमिर कोंदले।
चौऱ्याऐंशी लक्ष योनी। फिरता दुःख भोगिले।
ज्ञानदृष्टी हारपली। दोन्ही नेत्र आंधळे॥

 ज्ञानदृष्टी हरपली, की आंधळेपणाशिवाय काही उरत नाही. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून असंख्य दुःखे भोगली आहेत. ज्ञानदृष्टी हरपल्याने जे अंधत्व आलेय मग

कवणा मी शरण जाऊ। दृष्टी देईल निर्मळ॥

 याला कोणाला आंधळे बनल्यावर शरण जावे जो निर्मळ दृष्टी देईल, असा प्रश्न निर्माण झालाय.
 मग एकनाथ म्हणतात,

धर्म जागो सद्गुरूचा। जो का परउपकारी
आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारी॥धृ॥


 यावरही सद्गुरूशिवाय दुसरा आसरा नाही. तोच परोपकारी आहे. सद्गुरूला शरण जाणे त्याचे नामस्मरण करणे महत्त्वाचे. नाथांनी काही व्यवसायात्मक भारुडे लिहिली. त्यात सौरी, कुंटीण, जगझोडी वगैरे आहेत.
सौरीत एकनाथ लिहितात,

भोळा दादुला बाई म्या केला। संसार सारा नागविला॥१।
सौरी होऊन गेले सुख नाही झाले। पुनरपि संसारी मी हो आले
चार-पाच-सहा अठरासी रतले। त्यांचे संगे मन चावट झाले हो
एका एकी संत संग झाला। एका जनार्दनी संसार तुटला॥

 सौरी म्हणजे परमेश्वराची दासी, असा अर्थ आहे. सांसारिक सुख-दुःखांना अडचणींना संकटांना तोंड देता-देता माणूस थकतो व परमार्थाकडे वळतो; पण काम-क्रोधादी विकार पुन्हा प्रपंचाचा मोह लावतात. प्रपंचातच खेचण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी सद्गुरूची गाठ पडून त्याला सत्संग घडतो व त्यामुळे त्याची प्रपंचातून खऱ्या अथार्न सुटका होते.
 नातीगोती सांगणारी एकनाथांची भारुडे जास्त प्रसिद्ध आहेत. त्यात खाशी विनोदनिर्मिती आहे. दादला, पोर, मुलगी, वगैरेचा समावेश या नाती-गोती सांगणाऱ्या भारुडात करता येईल.

मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही॥१॥
मजाविता मला दादला नलगे बाई॥धृ॥

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ९४ ।।