पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते करताना भारूड हे माध्यम म्हणून वापरले.
 वासुदेव हा पहाटेप्रहरी दारात येतो; पण त्याच्या भारूड गीतातून तो उपदेशच करतो.

कर जोडोनि विनवतो तुम्हा
तुम्ही वासुदेव वासुदेव'म्हणा
नको गुंतू विषय कामा
तूम्ही आठवा मधुसूदना
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा

 कुठल्याही विषयात गुंतू नका म्हणजे थोडक्यात आपल्या विकारावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न सामान्य माणसाने साधायचा कसा? तर त्यासाठी तुम्ही मधुसूदनाचे म्हणजे कृष्णस्मरण करा. वासुदेव वासुदेव असे नामस्मरण करा. सर्वसामान्य प्रापंची जगण्यातही वासुदेवाचे स्मरण करणे सोपे असते. एकनाथ म्हणतात,

न लगे तीर्थांचे भ्रमण
न लगे दंड मुंडण
न लगे पंचाग्नि साधन
तुम्ही आठवा मधुसूदना
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.

 त्यासाठी गावोगावी भटकत तीर्थांना भेट द्यायची गरज नाही की, कोठे जंगलात वा एकांतस्थळी सर्वांपासून प्रपंचापासून दूर जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही किंवा व्रतवैकल्ये करून, उपासतापास करून शरीराला कष्ट द्यायचीही गरज नाही. घरात कुठेही एका ठिकाणी शांत बसून मन एकाग्र करून वासुदेवाचे, त्या नारायणाचे भक्तिभावाने क्षणभर स्मरण केले तरी पुरे आहे.
 एकनाथांचे समाजवाचन चांगले होते. आजूबाजूला बिघडत चाललेला समाज, भोंदूगिरी, राज्यकर्त्यांचे अत्याचार त्यांनी पाहिले. रयतेलाच जाणकार माणसं म्हणजे पाटील, चौगुले, महाजन वगैरे मंडळी त्रास देऊ लागली. लुटू लागली. सगळीकडे अनाचार माजू लागला. अशावेळी कोणी माणूस आता यातून समाजाला तारेल, ही इच्छा संपू लागली. दैवी अवतार घडला तरच यातून मार्ग निघेल, असं वाटू लागल्यावर एकनाथांनी कडकलक्ष्मीच्या मुखातून भारूड व्यक्त केले आणि त्या जगन्मातेलाच विनवणी केली. 'बये दार उघड' आता वेळ आली अहे. तुला सगुण रूप धारण करावे लागेल, याची विनवणी केली आहे.

उदो उदो ऐसा शब्द गाजतो
कामक्रोध दैत्यावर कोरडा कडाकडा वाजतो

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ९२ ।।