पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धनुष्य रामानं फिरवला, त्येचा खांडोर पाळला
सीता घाली वरमाला
झाला टाळ्यांचा गजर रामाचा जयजयकार
आनंदाचा वाहे पूर

 रामाने धनुष्य कसे पेलले आणि शेवटी सीतेनं त्याला वरमाला घातली आणि सीतास्वयंवर कसं घडलं, याचं उत्तम वर्णन या लोककथागीतांमध्ये येतं. हे वऱ्हाडी लोककथागीत आहे त्यामुळे तेथील प्रादेशिक भाषेचा संस्कार या लोककथागीतांवर झालेला आढळतो. छातीवर पळला, सरवाले परनाम केला, धनुष्याचा खांडोर म्हणजे तुकडा पाडला, असे विदर्भातले शब्द यात दिसून येतात.
 श्रावणबाळाची कथा तर प्रसिद्ध आहेच; पण त्यावरचे लोककथागीतही सुंदर आहे. खूपदा ही गीतं वाचली की, वाटतं यावर स्त्रीमनाचा प्रभाव आहे. कदाचित कोणा प्रतिभावंत स्त्रीनेसुद्धा ही रचली असतील. श्रावण बाळाच्या कथागीतांमधील श्रावणबाळाचा आई-वडिलांवर भक्तिभाव खूप सुंदर रीतीनं प्रकट झाला आहे. आई-वडिलांना काशीला घेऊन जाताना एका तळ्याजवळ थांबतो. आई-वडिलांना तहान लागली म्हणून पाणी आणायला जातो. तेथे दशरथ राजा शिकारीसाठी आलेला, त्याचा बाण त्याला लागतो, त्यावेळी दशरथ खाली येऊन त्याचा बाण काढायचा प्रयत्न करू लागतो, त्या वेळी या कथागीतात श्रावण बाळ त्याला म्हणतो,

बाण माझा काढू नका।
तिथं एक ईरक्ष्याचं झाड
तिथं माझा माय-बाप
त्याला पाणी जी पाजावं
मग माझा बाण काढावा.

 या कथागीतांमधील श्रावण त्याची बायको, श्रावण-दशरथ संवाद व दशरथ श्रावणाचे संवादही खूप वेगळे आहेत, ते कथागीताला वेगळा उठाव देतात.
 श्रावणबाळाचा मृत्यू झाल्यावर दशरथ त्याच्या आई-वडिलांना पाणी पाजायला जातो. त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर ते विलाप करतात. पुत्रवियोगाचे दुःख त्यांना सहन होत नाही. श्रावण बाळाचे आई-बाप दशरथाला शाप देतात.

माता कुरुंदंग आला बोलली दशरथ राजाला
तुला चौघजन पुत्र, तुला पानी न्हाई मिळायचं

 खरं तर तोपर्यंत दशरथ राजाला पुत्र नव्हता; पण शापातून त्याला पुत्र होणार, हा संकेतही येतो.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ८२ ।।