पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थाळीतून अन्न निर्माण केले. ही घटना घेऊन त्यावर गीत बनते.
 गोंधळी, वासुदेव, वाघ्या-मुरळी, भराडी, पोतराज या लोकसंस्कृतीतल्या संस्थांनी त्यांच्या गीतामधून अनेक छोट्या-मोठ्या कथा सांगितल्या आहेत. जोगती-जोगतीणी, नंदी बैलवाला, बहुरूपी हेही लोककथा गीतं सादर करतात. लोकगीतांमध्ये कथा नसते; पण लोककथागीतांमधून कथानक असते. त्यामुळे लोककथागीतं ही मोठी असतात, प्रदीर्घ असतात. लोककथागीतांमध्ये रचनेची विविधता असते. कधी ओवी-छंद, कधी कडव्यांचे पुनरावर्तन असते. नाट्यात्मकता असते व बऱ्याचवेळा त्याला सादर करणाऱ्याच्या अभिनयाची जोडसाथ असते.
 लोककथा गीतांमध्ये पौराणिक प्रसंगावर आधारित अनेक लोककथागीतं आहेत. सीतास्वयंवर कसं काय घडलं, याचं वर्णनही एका लोककथा गीतात येतं.
 यामध्ये जनक राजाची राज्यसभा, स्वयंवराची सिद्धता आणि घडलेला प्रसंग याचे रसोत्कट वर्णन केलेले आहे.

राजा जनकाचा मंडप, सोन्याच्या दियेचे खांब
माणिक मोत्याची झालर

 स्वयंवर मंडपाला जे खांब उभे केले होते, ज्यावर दिवे लावले होते, ते सोन्याचे होते. मंडपाला लावलेली झालर मोत्याची होती. यातून जनक राजाची ऐश्वर्यसंपन्नता वर्णन केली आहे.
 स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आले होते. त्यांचे जनकाने कसे स्वागत केले. शिवधनुष्य उचलण्याचा अनेक राजांनी प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. मग प्रत्यक्ष रावण उठला.त्याला त्याच्या ताकदीचा गर्व होता. तो उभा राहिला त्याचं वर्णन करताना म्हटलं आहे,

राजे मोठाले हारले रावन जोरानं हासला
दंड ठोकून उभा झाला
धनुष्य उचलाया गेला भार छातीवर पळला
माणदेह भईवर टाकला

 मोठ्या गर्वाने मिशीवर ताव देत उभा राहिलेल्या रावणाची फजिती झाली आणि मग शेवटी प्रभू रामचंद्र उभे राहिले

राम आखरी बसला, दरबारात उभा झाला
सरावाले परनाम केला
समदे पाव्हया लागले डोरे चित एक झाले
अंगुठ्याने फेकियेला धनुष्य वर उळवला
गमतीने झेलियेला

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ८१ ॥