पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुज्या माज्या भेटीला गं। वरीस बाई लोटलं
कसं तुला गं कंठलं। मायबाई

 गळ्याला कडकडून मिठी मारताना डोळ्यांतून अश्रूधारा वाहतील. एक वर्ष मध्ये गेलंय. आईलाही मग ती विचारेल, की माझ्याशिवाय तुला हे वर्ष कसं गेलं? माझी आठवण आली असेलच. दोघींच्या इकडच्या तिकडच्या गप्पा होतील. मग माहेरी आल्याचं कळल्याणं मैत्रिणी पटापटा भेटायला येतील. मनातलं आतलं सगळं मैत्रिणीजवळच बोलता येतं. तिथं काही आडपडदा नसतो. मैत्रिणी सासरबद्दल विचारतील. स्पष्ट काही सांगता येणार नाही; पण दडवूनही ठेवता येणार नाही आणि मग सूचकतेनं सांगता येईल,

सासरचं बाई गोत। कडुनिंबाचा गं पाला
पालामा नावासाठी गोड केला। देसाईरायाच्या...

 कोण्या देसायाची ही मुलगी माहेरचं नाव टिकून राहावं, त्याची प्रतिष्ठा टिकावी म्हणून सासरी चाललेला तो सासुरवास कडुनिंबाच्या पाल्यासारखा कडवट असला, तरी तो गोड मानून सहन करते आहे.

 खूपदा सासरची माणसं सुनेला माहेरी पाठवायची टाळाटाळ करतात. सणासुदीलाही तिला माहेर दिसत नाही. सासरची खूपशी कामे सून माहेरी गेली तर मग कोण करणार? सतत घाण्याला जुंपून घेतलेल्या बैलासारखं तिचं जिणं होतं. कवी इंद्रजित भालेराव त्यांच्या कवितेत म्हणतात

लेकीचा जलम
जसा गाजराचा वाफा
येड्या तुम्ही मायबापा
जलमा घालून काय नफा
लेकीचा जलम
कोणा घातला येड्यानं
परायाच्या घरी
बैल राबतो भाड्यानं

 सासुरवाशिणीचं हे जिणं त्यांच्या कवितेतून लक्षात येतं. हीच वेदना कोणी उषाबाई नावाची खेड्यातली बाई तिच्या ओवीतून व्यक्त करताना म्हणते...

सासुरवाशिणी तू गं वाड्यातला बैल
कधी रिकामी होशील उषाताई ।

 बाईच्या मनातली ठसठसती सासरची वेदना तिच्या मनातलं माहेर सतत जिवंत ठेवत असते.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ७२ ॥