पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सासरच्या वाटे कुचुकुचु काटे

 सारखं लोकगीत आळवलं जायचं. माहेरची आठवणींची वाटही फुलांपेक्षा मऊशार वाटायची. माहेरवरून आलेला एखादा अनोळखी पांथस्थही जवळचा वाटायचा. 'प्रभात'च्या 'संत तुकाराम' चित्रपटातली तुकारामची पत्नी आवडीही तिच्या माहेरवरून आलेल्या म्हैशीचे कोड-कौतुक करताना दाखवली आहे. मनातलं गुज जणू ती त्या म्हैशीबरोबर बोलत असते. तिला एखाद्या लेकराप्रमाणे जपत असते. हे सगळं लोकमानसाचं प्रतिबिंबच त्यात चित्रित झालं आहे.

 निवांत वेळात जेव्हा दोन सासुरवाशिणी एकत्र येतात, तेव्हा स्वतःच्या माहेराबद्दल सांगतात. कधी एखादीला कोणी बोलायला मिळालं नाही, की दाराशी आलेल्या पाखराशी ती बोलते...

रूणझुणत्या पाखरा रे
जा माझ्या माहेरा
कमानी दरवाजा रे
त्यावरी बैस जा
घरच्या आईला रे
सांगावा सांग जा
दादाला सांग जा रे
ने मला माहेरा

 माहेरला जायची ओढ मनात सतत साचून राहिलेली असते. ते अंगण, ती ओसरी, माजघर, कमानी दरवाजा सगळं आठवत असतं. मग पाखराबरोबरही निरोप धाडावा वाटतं. ते भुर्रकन उडून जाणारं पाखरू आपलं वाटायला लागतं. त्याचं कुठंही जायचं स्वातंत्र्य प्यारं वाटू लागतं. त्याच्याजवळचा निरोप चटकन पोचेल आणि कोणी तरी भाऊ आपल्याला सणाच्या निमित्तानं चार दिवस माहेरी न्यायला येईल, ही वेडी ओढ मनाला लागून राहते.

माहेराची वाट। दिसे सोनियासारखी।
कधी जाईन मी बाई। वारियासरसी

 वाऱ्यासारखं जावं आणि माहेराला पोचावं, असं तिला वाटू लागतं आणि मग ती माहेराची स्वप्न रंगवू लागते,

माहेरा जाईल। बसलं पारावरी जिला
भासा राघव विचारी। आत्याबाई कवा आली

 भाचा पारावरच बसलेला असेल तो धावून जवळ येईल. आत्या आल्याचा त्याला आनंद होईल आणि ओसरीत गेल्या-गेल्या कधी आईला भेटेन असं होईल.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ७१ ॥