पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चरत गायत्री शेती आली, तिच्या मुखावर मारू नको
झाली म्हातारी गाय बापा, कसाबाला तू विकू नको
मूल घातला साळमंधी, लाड त्याचा तू करू नको
वडीलबंधू बापापरमानं, मर्जी मोडून बोलू नको
पित्याच्या वंशी जन्म घेतला, त्याच्या सेवेला चुकू नको
आईच्या पोटी जन्म घेतला, वाईट वंगाळ बोलू नको
दोघा भावांचा तंटा लागला, सरकारामधि जाऊ नको

 या गाण्यात एक तळमळ जाणवून येते. माणुसकी जिती ठेवण्याचं भान या गाण्यातून प्रकट होतं.

 वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी मिळणारं दान बहुतेकवेळा स्त्रीच्या हातून मिळायचं. त्या कुलवंत स्त्रिलाही गाण्यावाटे चार शब्द त्याला सांगावेसे वाटले असावेत. दारात तुळशीवृंदावन असणार. त्या तुळशीजवळच पहाटे वासुदेवाचं गाणं रंगत असणार, त्या साक्षीच्या तुळशी संबंधात वासुदेव म्हणतो

तुळस वंदावी-वंदावी
मावली संताची सावली॥
तुळशी ऐसे लावता रोप
पळून जाती सगळे दोष।
तुळशी घालित ऐसे वटी
विघ्न जातील बारा वाटा।
तुळशी घालीत ऐसे पाणी
झाली पातकाची धुणी।
तुळशी लावीत ऐसे गंधा
तुटतील येमयाचे बंधा।
तुळशी घाली प्रदक्षिणा
पाठीमागे उभा कान्हा
तुळशी ऐसे दावित निवेद
भोजना बैसले गोविंद।

 तुळशीला वंदन केल्याने, लावल्याने सगळे दोष जातात, विघ्नं नष्ट होतात, पातकांचा नाश होतो, यमबंध तुटतात. मृत्यू दूर जाईल, देव पाठीशी उभा राहील, असं वासुदेव म्हणतो.

 वासुदेव काहीवेळा वेगवेगळ्या कथा सांगत जातो. त्यात मग प्राणीही बोलके होतात; पण ते सर्व गाण्यातून ऐकताना ऐकणारा मुग्ध होतो. हरणीच्या पाडसाची कथाही काही ठिकाणी वासुदेव सांगतो.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥६६॥