नामदेवासी म्हणे ब्राह्मण जाय तू अमंगल
बाहेर करशील तू विटाळ
गेले रावळामागे नामानं केले दगडाचे टाळ
देवानं फिरवले राऊळ
सखूबाईच्यासाठी देव सखुबाई झाली
सखू पंढरीला लावली
सावतामाळ्यासाठी देव ब्राह्मण झाला
याने पोटात साठविला
चोखा मेळ्यासंगे यानं ओढली गुरं
का अशी पीर्त भक्तावर...
वासुदेवाची गाणी सरळ साध्या-सोप्या भाषेतली आहेत. फारशी अलंकारिकता नाही, न समजेल असं काही नाही. कलियुगात सर्व कसं चाललंय, लबाडीला ऊत आलाय. नातं नात्याला जाणत नाही. प्रेम राहिलं नाही. नीतिमत्ता लयास गेली आहे. हे सगळं सांगताना मग वासुदेव म्हणतो...
लबाड दुनिया बालंट निघाली, कशी कली फिरली
डोळ्यांवरती धुंदी चढली, वळख नाही धरली।
या गीतामध्ये वासुदेवाचं बारीक निरीक्षण जाणवून येतं
काशी केली, यात्रा केली, मिशा काढून आला
जिवंत होते आई-बाप तेव्हा अन्न नाही दिलं दोघाला
माणूस कसा वागायला लागलाय हे सांगताना पुढं तो म्हणतो...
हजार रुपयांचा हुंडा घेतला लेकीच्या बापानं
म्हातारा नवरा डंगरा पाहून, लेक दिली त्यानं
जगाची नीती उलट झालीय. मुलीच्याच बापानं म्हाताऱ्या नवऱ्याकडून पैसे घेतले आणि मुलगी जणू विकलीच आणि सगळीकडे दुनियेत अशी अंदाधुंदी माजली आहे. हे जेव्हा त्याच्या ध्यानात येते तेव्हा मग वासुदेवालाही राहवत नाही. जगाला चार चांगले शब्द सुनवावेत- काही चांगला उपदेश करावा. त्यातून माणसाच्या मनाचे परिवर्तन होते का पाहावं- असं त्याला वाटलं असावं म्हणून मग एका गाण्यात तो बळीराजाला सांगतो...
बळीच्या वंशी जन्म घेतला, काळिचा धंदा सोडू नको
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरी भजल्याविण राहू नको
दिली देवानं धनसंपदा, गर्व मनामधि धरू नको