पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूप्याचं ताट, सोन्याची आरती
ओवाळती माणिक मोती
घरी राज लक्ष्मी येती
वर्षा वर्षा दिवाळी
माणिक मोती ओवाळी
दिवाळीच्या सनाला

 त्या दिवशी ओवाळणीचा तिचाही मान असतो. खरं तर पूर्वीचे जे बारा बलुतेदार मानले जात, त्या सर्वांना दिवाळीची ताटं वाढून दिली जात. त्यांच्याही घरी गोडधोड पोचावं. त्यांनाही दिवाळीचा आनंद मिळावा, ही त्यापाठची भावना असे.
 अरुणा ढेरे यांच्या 'यक्षरात्र'मध्ये दिवाळीचा एक सुंदर वेगळा संदर्भ येतो. दिवाळी म्हणजे यक्षांची रात्र, त्यामुळे दिवाळीला यक्षांचीही पूजा केली जाते. कुबेर हा यक्षांचा राजा मानला जातो आणि लक्ष्मीला त्याची पत्नी मानल्याचे उल्लेख येतात. हे दोघेही 'संपत्तीचे देव' म्हणून त्यांची पूजा.
 दिवाळीला जे दीप उजळण्याची प्रथा आहे ती यमधर्मासाठी आहे, असंही मानलं जातं. दक्षिण दिशेला तोंड करून दिवे उजळवतात ते मृत्युदेव यमधर्मातलाच. एकदा यमदूतांनी विचारलं, 'आम्हाला खूप वेळा काही जणांना अकाली मृत्यू द्यावा लागतो, त्या वेळी खूप वाईट वाटतं. भरल्या संसारातून अचानक असं उठवून नेणं क्लेशदायक वाटतं. ते टाळता येणार नाही का?' तेव्हा मग यमधर्मानं आश्वासन दिलं, सांगितलं, 'धनत्रयोदशीपासून चार दिवस जो दिवे उजळील आणि दीपदान करील त्याला अपमृत्यू येणारच नाही.' त्यामुळे दिवाळीत दीपोत्सव करण्यापाठी आयुष्यवृद्धीचा एक धागा जोडला गेला असं जाणवतं.
 खरंतर सर्वसामान्य माणसांचे आयुष्य थोड्याफार कष्टात, अडचणीत जातात. सुख-दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ तर चालूच असतो. वर्षातून येणारा हा दिवाळीचा सण श्रद्धायुक्त आनंद जोपासणारा असा सण असतो. चार घटका सर्वांनी एकत्रित होऊन साजरा केलेला आनंद दीपोत्सव आहे. तसा सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा करतात. राजस्थानात राम वनवासातून येण्याचा दिवस म्हणून दीपोत्सव करतात. डोंगराळ भागातले व सिंधी लोक रात्री मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक दिवाळीत रात्री द्युत खेळतात. बंगालमध्ये कालीमातेपुढे स्तोत्रे गायिली जातात. आंध्रात लक्ष्मीच्या स्वागताचा सण समजतात.

 संतांनी अभंगातून दिवाळीचे वर्णन केले आहे. ते अंतर्यामीच्या प्राणाचा दीप उजळवण्याचा सल्ला देतात, असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। १६६ ।।