पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आणि मग खूप वाट पाहिल्यावर लेक माहेराला येते. मायेचा जीव भांड्यात पडतो. तिच्याही दिवाळीला मग खरा रंग चढतो. काही बहिणी सासरी भाऊबीजेला भावाची वाट पाहतात. वेळ जायला लागतो, भाऊ दिसत नाही. मन हुरहुरायला लागतं. आपल्याला ओवाळणी घालावी लागणार. त्यालाही काही संकट असेल. बिना ओवाळणी बहिणीच्या घरी कसं जायचं म्हणून तर तो आला नसेल का?

लागेल घालावी फार मोठी ओवाळणी
चिंता काय मनी भाऊराया?
नको धन, नको मुद्रा, नको मोतीयांचे हार
देई प्रेमाश्रुची धार भाऊराया
आवड मला बह, लुगडं नको घेऊ
अंतर नको देऊ, भाऊराया

 मला लुगडं आवडतं; ते दिलं नाहीस तरी चालेल; पण मला अंतर देत नको, असं ती मनातल्या मनात त्याला विनवते. तिला पुन्हा क्षणभर वाटतं,

वळवाचा पाऊस पडोनी ओसरला
भावाला झाल्या लेकी भाऊ-बहीण विसरला

 भावाला लेकी झाल्यावर तर तो आपणाला विसरला नाही ना? असंही तिला वाटतं. आई-बाप असेपर्यंतच मुलीची माहेरची सत्ता नंतर मग माहेर सगळं जणू भावजयीच्या ताब्यात जातं. माहेरावर आपली सत्ता उरत नाही. लोकलाजेस्तव भाऊ नेले तर नेतील; पण त्याचा काही भरवसा नाही.

वडील, भावजय परी आईच्या समान
पित्याचा तुला मान भाऊराया
माय तो माहेर बाप तो माझी सत्ता
नको बोलू भाग्यवंता भाऊराया
बहिणीशी नको आता वाकडा बोल लावू
सांभाळ तुझा तोल भाऊराया
वाकडा तुझा बोल तुझे कापील काळीज
सासरी गेल्यावर बहिणी कोठून येतील

 तिथं सगळा आनंदोत्सव असतो. ही बहीण चार दिवसांची पाहुणी म्हणून भाऊबीजेनिमित्ताने येते; पण आनंदानं घरदार उजळून जाते. दिवाळीच्या दिवशी तर खेड्यात परटिणीचाही मान असतो. वर्षभराची गावाची धुणी धुते. मात्र, दिवाळीच्या पहाटे परटीण ताटात आरती घेऊन घरोघरी जाऊन पुरुषांना ओवाळते. त्या वेळी म्हणते,

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १६५ ॥