पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मदभूषण जो भुजंग तो तरी टपला गणपति वाहनासी
भक्षण म्हणउनी इच्छा त्याची पुढे करावी गत कैसी ।

 उमापती शंकरांनाही दोन बायकांमुळे झालेला त्रास गोंधळी सर्वसामान्यापुढे मांडतो. देवांनाही लौकिकातली दु:खे भोगताना पाहून सर्वसामान्य माणूस अचंबित होतो. पुढे रमापती विष्णूचेही दुःख विष्णू शंकरांना सांगतात

दोघी बायका सिवाय नायका । खेद मला त्याचा भारी ।
जगत्लक्ष्मी ऐसे असता । नाही ठिकाणा संसारी ।
येक विमुका पतिच्या लेक । कोण करी तिचा ओधारी ।
चंचल दुसरी स्वभाव तिचा जाणसी की मदनारी ।
ऐशा असता स्त्रिया प्रपंची । कोण सुखी त्या माझरि
पुत्र ऐकतो शरीर विरहित । त्रिभूवन विजय संसारी ||
ऐशा या भवदुःखसमुद्री । उपाय करू मी कोसारी ॥

 दोघेही देव जणू आपापल्या जगण्याला कंटाळल्यासारखे झालेत. माणसांसारख्याच देवांनाही वेगवेगळ्या विवंचना आहेत, समस्या आहेत. त्याचं कसं निरसन करावं, हे त्यांना समजेना झालेय. निदान मनातलं दुःख कुठं ना कुठं उघड केल्यानं ते कमी तरी होईल, या भावनेनं या गाण्यामध्ये शंकर आणि विष्णू ते एकमेकांसमोर व्यक्त करताहेत. कोण्या कौलापुरी राहणाच्या कृष्णकवीचे हे गीत गोंधळी गातात.
 संतांनी लिहिलेल्या गोंधळात भारूड आणि गोंधळ साधारणत: सारखेच वाटतात. एकनाथ महाराजांनी अनेक भारुडे लिहिली. नाथांनी लिहिलेला एक गोंधळ आहे, ज्यात गोंधळाची जी मांडणी असते म्हणजे चौक भरणे, कलश ठेवणे, दिवटी लावणे या संबंधित विश्वव्यापकतेने प्रतीकात्मक विचार केला आहे. द्वैत-अद्वैत भावभक्ति, वैराग्य ज्ञान यांचा वेगळा भाव त्यातून प्रकट केला आहे.

सुदिन सुवेळ तुझा गोंधळ मांडिला वो
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवर बांधिला वो ॥
चंद्र-सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो
घालूनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥
उदो बोला, उदे सद्गुरू माऊलीचा वो ॥धृ॥

 नाथांनी सद्गुरू माऊलीचा गोंधळ मांडला आहे आणि त्याचे वर्णन केले आहे. ही सद्गुरू माऊली म्हणजे विठ्ठलच आहे. उसाच्या मखराऐवजी नाथांनी ज्ञान वैराग्याचा फुलवरा गोंधळावर मांडला आहे. चंद्र आणि सूर्य दोन्हीचा पोत पाजळला आहे. पुढे ते म्हणतात,

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १४४ ॥