पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गावोगावी असणाऱ्या गोंधळ्यांकडे अनेक वेगवेगळी गीते पूर्वांपार चालत आली आहेत. त्यांचे एकत्रीकरणाचे प्रयत्न झाले. सरोजिनी बाबर संपादित 'एक होता राजा' मध्ये काही लोकांकडून एकत्रित केलेली गोंधळी गीते आहेत.
 एका गोंधळ्याच्या गौळणी गीतामध्ये कृष्णाला पाहायला गौळणी निघाल्या आहेत, त्याचं वर्णन केलं आहे. त्यात ते त्याची ठकी, कासारीण सखी, धनगराची भिकी, सोनारीण संगी, चाट्याची लिंगी, सुतारीण मैना अशा प्रत्येक जातीच्या वर्णनासहित गौळणीची नावे घेतली आहेत. श्रीकृष्ण हा सर्व समाजस्तरातल्या गौळणींना प्रिय होता, हेच यातून सांगायचे आहे आणि या सगळ्यांना बोलावून

हरिपाशी जाऊ, चला मुख डोळां पाहू
त्याच्या पदी चित्त लावू
असा विचार करत्या झाल्या

 असा गाण्याचा शेवट आहे.
 नागपंचमीवरच्या एका गीतातही अशीच सर्व जाती-घटकातील स्त्रियांची नावे येतात; पण सोबत तिच्या सवयी, तिचं दिसणं वा तिच्या वागण्याचा एखादा उल्लेख देऊन तिची ओळख दिली आहे.

आली सुतारीण बबी, तिच्या बोलण्याची खुबी
हाती तपकिरीची डबी, हाक मारी खेळगडणीला
आली घिसाडीण हिरी, न्हाई पदर डोईवरी
तिची तारांबळ सारी, न्हाई कुंकू तिच्या कपाळाला
आली धनगराची नार, नाकी शेंबुड हिरवागार
रडतं काकंला प्वार, नका घेऊ तिला संगतीला
आली म्हराटीण साळी, तिची रीत साधी भोळी
न्हाई वडारणीला चोळी, कशी बोली कळायची तिला

 या सगळ्यात फक्त म्हराटीण तेवढी 'साधी भोळी' म्हटलं आहे. बाकी प्रत्येकीच्यात काही ना काही खोडी आहे. खरं तर या सर्वांना जमून वारुळाला जायचं आहे; पण कुणा एकीच्या स्वभावधर्माचं खास दर्शन यातून सामोरी येतं.
 देवांच्या दुःखाचे वर्णन असलेले आणखी एक गोंधळी गीत सापडते. त्यामध्ये शंकर आणि विष्णू दोघेही आपापली दुःखे एकमेकांना सांगत आहेत. एका ठिकाणी शंकर म्हणतात,

भार्या दोघी गिरिजा गंगा नित्य कलह होतो त्यांसी
येक मस्तकी दुजी बैसली गणपति घेऊनि कटिदेशी ।

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १४३ ॥