पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रवृत्ती निवृत्तीचे घालुनी शुद्धासन वो ।
ध्येय-ध्याता - ध्यान प्रक्षाळिले चरण वो ||
कायावाचामने एकविध केले अर्चन वो ।
द्वैत-अद्वैत-भावे दिले आचमन वो ॥
भक्ति वैराग्य ज्ञान याही पूजियेली अंबा वो।
सद्रूप चिद्रूप पाहूनी प्रसन्न जगदंबा वो ॥
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो।
त्राही त्राही अंबे, तुझा दास उभा वो ॥

 नाथांनी विठ्ठल ही माऊली अणि तीच आई भवानी, जगदंबा अंबा मानली आहे. संताच्या साहित्यात अभंगाच्या सोबतीने जे गोंधळ लिहिले गेले आहेत, ते वेगळा विचार मांडणारे आहेत. महत्त्वपूर्ण आहेत.  राजेरजवाड्यांच्या काळात पेशवाईत गोंधळी लोकांना चांगली बिदागी मिळत असायची. त्यांचा मान राखला जायचा. भरपूर बिदागी दिली जायची. कधी सोन्याच्या नाण्यांच्या रूपात, कधी कडी-तोडे, गाठे, चौकडे, शेले या रूपांतही त्यांना गौरविले जायचे.

 अजूनही खेडोपाड्यांत लग्नानंतर गोंधळाची प्रथा टिकून आहे; पण गोंधळी लोकांना फक्त याच व्यवसायावर उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. पूर्वी गोंधळ्यांना मिळणारी बिदागी भरपूर असायची. राजेरजवाड्यांची त्यांना मदत असायची. या गोंधळी प्रथेला हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वांपार चालत आलेली ही प्रथा लोकसाहित्यात या प्रथेचं वेगळं स्थान आहे, महत्त्व आहे. काळाच्या रेट्यात लोकसंस्कृतीतल्या काही प्रथा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गोंधळाची प्रथा अजून बऱ्यापैकी टिकून आहे. नाहीतर 'गोंधळी' ही जमात हळूहळू संपून जाईल वा हे लोकसाहित्यातले गोंधळ मिटून जातील. ते शब्द होऊन टिकून राहणे महत्त्वाचे आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। १४५ ॥