पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुण्याची पर्वती गोंधळा
वाईचा गणपती गोंधळा ये

 अशारीतीनं मग कृष्णा, कोयनासारख्या नद्यांना, सातारची मंगळाई, रत्नागिरीचा जोतिबा. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, कारंडीची येलूबाई, म्हसवडचा सिद्धनाथ, शिंगणापूरचा महादेव, फलटणचा राम, नाशिकचा काळाराम, कवठ्याची यमाई, वाड्याची घोलाई, जुन्नरची शिवाई अशा देवतांना गोंधळी बोलवत राहतात. त्या त्या परिसरातील देवदेवतांना त्यात जास्त सामाविष्ट केले जाते. शेवटी

साती समींद्रा,गोंधळा ये.
नवलाख तारांगण, गोंधळा ये
धरतरी माता, गोंधळा ये
आगाशी पिता, गोंधळा ये
भक्ताच्या गणा, गोंधळा ये
राहिले साहिले, गोंधळा ये

 सर्वात शेवटी कोणी राहू नये म्हणून राहिले-साहिले 'गोंधळा' ये म्हणत हे आवतनं पूर्ण होते.
 या गोंधळामध्ये कलश, लावलेल्या उसाचे मखर, तांदळाचा चौक, नाचणारे गोंधळी या सगळ्यांबाबत एका गोंधळ गीतात प्रतीकात्मक उल्लेख येतात. या गोंधळाची व्याप्ती कशी आहे, त्याचं महत्त्व केवढं मोठं आहे, हे सांगण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. गोंधळी या गीतात म्हणतो

मायेचा निजरूप छायेचा गोंधळ मांडिला
प्रथम निरांजनी निराकार आदिशक्ती अवतार
मंडप विलासी आकाशी त्रिभुवनी प्रकाश आंबेने
आकारिला सुवासिनी, गव्ह गव्ह पाचीजण
ज्याने मन गिरासले माहेर क्रोध न मद मत्सर
गोंधळ मांडिला।

 संपूर्ण पृथ्वीतलाला व्यापून राहिलेल्या निजरूप छायेचा आदिशक्तीचा गोंधळ मांडला आहे. चौक कसा भरलाय तर

चौक हा भरियला चौकोनी नवलाख तारांगणी
घट हा उभारिला, ब्रह्मरस आत्मराज कलश
घट हा उभारिला, पाच ऊस पाच तत्त्वाचा प्रकाश
माळ ही लांबवली दिवटी चंद्र-सूर्य दोन्ही उदेभानू

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १४० ।।