पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठं कठीण गं मोठं कठीण
मोठं कठीण गं सबजन शाही
हरी पडलाय आमच्या डायी।

 मग कोणी सांगते त्याने (कृष्णाने) माझे दोन्ही हात धरले, कोणी म्हणते मी भांडी घासत होते. कृष्ण दांडी मारून गेला. कोणी म्हणते मी धार काढत होते आणि कृष्ण दूध पिऊन गेला, कुणी म्हणते मी ताक घुसळत होते कृष्ण लोणी खाऊन गेला, कोणी म्हणते मी चूल घालत होते, तर खेळायला फूल टाकून गेला. लोकगीतातल्या गौळणीत शृंगारभाव फारसा नाही. एकदरीत या गौळणीमधील वात्सल्यभाव जास्त प्रतीत होतो.
 संत कवयित्रीमध्ये महंदबेचे 'धवळे' प्रसिद्ध आहेत. या स्फूटरचना गौळणीशी साम्य साधणाऱ्या म्हणता येतील. कान्होपात्रा तिने आर्त विरहिणीची रचना केली आहे. मध्वमुनीश्वर, माणिकप्रभू, रमाणात्मज, अमृतराय, कृष्णकिंकर यांनीही गौळणींची रचना केली आहे.

 राधा-कृष्ण यांच्यातला प्रीतीभाव, गौळणी आणि कृष्ण यांच्यातला शृंगारभाव, यशोदा-कृष्ण यांच्यातला वात्सल्यभाव या सगळ्यांचं एक सुंदर वर्णन एकंदरीत सर्व गौळणींमधून पाहावयास मिळतं. कृष्णाबद्दलची, त्याच्या भेटीची, कधी संगाची आतुरताही जाणवते. पण सर्वांमागे त्याच्यात लीन होऊन जाण्याची भावना असतेच. भक्तीरसात न्हाऊन चिंब करणारी गौळण ही मराठी मनाचा ठाव घेणारी आहे. भावभाबड्या खेडोपाड्यांतील माणसाचं भावविश्व व्यापून टाकणारी आहे. 'वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले' कोणी म्हणायला चालू केलं, की माणूस भावविभोर होतोच. टाळ-मृदंगाच्या तालात डोलू लागतो. त्याच्या दृष्टीच्या चौथऱ्यावर कृष्णभेटीला आतुर झालेली राधा साकारू लागते आणि तो स्वत:च कृष्णमय होऊन जातो. हीच तर गौळणी गीतांची किमया आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १३६ ॥