पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यासी विचारतां ये सिद्धांत वोळगे या न
यासी विनविता हाचिं वरि मांगे वो॥

 शाहीर कवींनीही गौळणींची रचना केली आहे. शाहीर परशुराम, होनाजी बाळा, प्रभाकर यांनी गौळणी लिहिल्या आहेत; पण त्या लोकनाट्यातील नाटकाच्या अंगाने जाणाऱ्या त्यामुळे इथला कृष्ण हा वेगळा वाटतो. तमाशातली गण-गौळण पाहिली, की जाणवते त्यात शृंगारभाव अधिक असतो. या गौळणीमध्ये ग्राम्यभाषेचा बाज जास्त जाणवतो. परमेश्वरी अवतारापेक्षा हा कृष्ण जास्त मानुषी वाटतो. मग तो स्त्रियांची उघड छेड काढतो, कंचुकीच्या गाठी सोडतो, गोपींचे कुचमर्दन करतो. त्याच्या उनाडक्या या गवळ्याच्या उनाड पोराचं प्रतिबिंब शब्दबद्ध करणाऱ्या वाटतात. राम जोशींच्या गौळणीत असाच कृष्ण भेटत राहतो.
 पठ्ठे बापूरावांची एक गौळण आहे

श्रीकृष्णा शारंगधरा
मी लाजून धरिते करा
चला न्हेते माझ्या मंदिरा, उडवा रंग रंग रंग

 ही तशी लावणीच्या बाजाचीच. अनुप्रासाच्या माध्यमातून एक नाद यात निर्माण केलाय. यात शृंगारभाव तर आहेच; पण कामातुरताही आहे. उघड आव्हानही आहे, ते लिहितात,

चौऱ्यांशी तऱ्हेच्या चवी
चाल दावा एक एक
नवीन अनुभवीक नवलाची हवी
म्हणे पठ्ठे बापूराव कवी
भवरसाची आहे काकवी करू नये भंग भंग भंग

 पठ्ठे बापूराव हा शाहिरी परंपरेतला अखेरचा प्रतिष्ठित कवी, असं डॉ. वसंत जोशी यांनी म्हटलं आहे. ही गौळण ही अभिसारिकाच वाटते. इथे कृष्ण हा फक्त सजन आहे. लौकिकातला देखणा पुरुष आहे असं वाटते. मग गौळणीतून पठे बापूरावांनी चंद्रावळीकडे राहीच्या रूपात जाऊन शृंगार करणारा कृष्ण शब्दबद्ध केला आहे. मीलन प्रसंग खुलवला आहे.
 राम जोशी यांच्या एका गौळणीत (होरी) लिहितात,

पुरुषवेष राधा निजवेष कवटाळुनि चुंबिती।
म्हणून गोपिका शुद्ध राधेला आलंगिती।
अंगसंग रतिभंग दंगरंगामधी किती लाजती।
मनी म्हणती कामिनी नव्हे माधव सुखसंगती।

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १३४ ॥