तुका म्हणे शेवटा नेलें
संपादिले उभयतां॥
परमेश्वराची आस वाढली, की लौकिकाची पर्वा उरत नाही आणि मग तेव्हाच परमेश्वर सर्वार्थाने सामावून घेतो. सुख-दुःखाच्या पार नेतो. मागची चिंता उरत नाही. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून मोक्षप्राप्ती होते.
तुकारामांच्या विरहिणीही इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या व धीट आहेत.
बाळो जन मज म्हणोत शिंदळी।
परी हा वनमाळी न विसंबे॥१॥
सांडूनी लौकिक झालिये उदास।
नाही भय आस जीवित्वाची॥२॥
नाइके वचन बोलतां यां लोकां।
म्हणे झालो तुका हरिरतां॥३॥
परमेश्वररूपी कृष्णावर निष्ठा जडते, प्रीती जडते, तेव्हा मग कोणी काय म्हणेल, याचा विचारच उरत नाही. लौकिक प्रलाप मनावर घेत नाही कारण मन केव्हाच प्रभूचरणी लीन झालेले असते. इथे तुकारामांनी वापरलेला 'हरिरता' हा शब्द खूप सुंदर व अर्थपूर्ण आहे. परमेश्वराशी म्हणजे हरीशी रत होणे म्हणजेच उत्कट मीलनाची परिपूर्ण अवस्था प्राप्त होणे. इथे एकात्म अवस्था साध्य होते. ईश्वर व भक्त यात वेगळं काही उरत नाही आणि अशा अवस्थेला गेल्यावर मग आणखी काय हवं!
तुकारामांच्या गौळणीमधील शब्दरचनाही सोपी आहे. सरळ आहे; पण तरीसुद्धा मनीचा भाव परखडपणे स्पष्ट करणारी आहे. आध्यात्मिक गूढतेचा क्लिष्टपणा त्यात नाही. भावगर्भता मात्र आहे, हे नक्की.
संत निळोबांनीही जी गौळणीची रचना केली आहे, त्यात परमेश्वर प्राप्त झाल्यावरची एक तृप्ती आहे ती जाणवून येते. त्यात सात्त्विकभाव आहे. त्यात कृष्णाचे वर्णन आहे, त्याची स्तुतीही, केली आहे. त्याच्या बाललीला आहेत. त्याच्याविषयीची गोपींची गाऱ्हाणी आहेत; पण या सर्वांहनही श्रीकृष्णाचे परब्रह्मस्वरूपच त्यांच्या गौळणीमध्ये व्यापून राहिले आहे ते लिहितात,
ऐसा निजानंद परमात्मा श्रीहरी।
आम्ही लाधलों वो भाग्याच्या संसारी।
नित्य आळगू या हृदयामाझारी!
ऐशा निजबोधे निवाल्या सुंदरी वो।
यासी विवरितां परमार्थ हाती लागें .