पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका जनार्दनी। भिक्षा वाढा बाई।
देव एकनाथाचा बछडा॥४॥

 या नादनृत्याची धुंदी श्रोत्यांवरही राहावी, अशी सुंदर शब्दरचना या गौळणीत आहे. नाथांच्या सगळ्या गौळणींचे मुखडे हे आकर्षक आणि गेय आहेत. मग ती कसा मला टाकूनी गेला राम' असू दे, की 'वारियाने कुंडल हाले' असो, की 'येई वो श्रीरंगा कान्हाबाई' असो त्यामुळे सगळीकडे भजनात नाथांच्या गौळणी जास्त प्रमाणात गायल्या जातात व लोकप्रियही आहेत. एकनाथांनी उत्तरेत भ्रमण केले होते. तेथील गोपीगीतांच्या प्रभावामुळे असेल कदाचित; पण नाथांच्या गौळणीत खट्याळ शृंगारभाव व मिश्कीलपणा जाणवल्याशिवाय राहात नाही.
 प्रत्येक संतांचं स्वभाववैशिष्ट्य त्यांच्या गौळणीरचनेत जाणवून येतच. तुकारामांची गौळण ही जास्त धीट वाटते. तिचे कृष्णावर असलेले प्रेम ती व्यक्त करते त्यामध्ये ती कामभाव दडवत नाही. तिचा मुग्धशृंगार ती धीटपणे व्यक्त करते. तुकारामांनी त्यांच्या आयुष्यात जो तीव्र लढा वेगवेगळ्या पातळीवर दिला आहे. मग तो समाजाशी असो, स्वत:चा स्वतःशी असो, समोर आलेल्या दांभिकतेशी असो वा कौटुंबिक पातळीवरचा असो, त्यामुळे त्यांच्या शब्दाला एक धार आलेली आहे. ते समाजात जे वाईट दिसतं, त्यावर त्यांच्या शब्दांचा ते कठोर प्रहार करतात; पण तरी काही गौळणीत तुकारामांची कोमल भाववृत्ती जाणवते. त्यांची गौळण श्रीकृष्णाची टोकाची भक्ती करते आहे, त्याच्या भक्तीने ती इतकी भारलेली आहे, की मग तिला देहभावाविषयी उदासीनपणा आलेला आहे. कुठल्याही कारणाने कृष्णभेटीची आस तिला लागून राहिली आहे. त्याच्या भेटीसाठी ती वेगवेगळी कारणे शोधत आहे. मग घरात असलेले पाणी ती ओतून देते व पाणी आणण्याचे कारण पुढे करून ती घराबाहेर पडते.

एकली राना गोविंदा सर्वे
गेले ठावे ते जाले॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी
नाही विषम जवळी आतळले॥२॥
नव्हती देखिली म्यां वाट
म्हणोनी हा धीट संग केला॥३॥

 कृष्णभेटीची आतुरता त्याच्याशी संग करण्याची तीव्र इच्छा यातून प्रकट होते. समाजाची पर्वाही न करता गोविंदाचा सहवास मिळण्यासाठी केलेले धाडस. शेवटी मग तुकाराम म्हणतात,

आहेव मी गर्भारपणे
हे सांगणे का लागे॥

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १३२॥