पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कृष्णाच्या काळेपणात गुंतलेलं, नामदेवाचं भाववेडं मन या गौळणीतून सामोरी येतं. त्या रंगात रंगलेपणाची भावना नामदेवांच्या या प्रतिमांतून साकार होते. हे भावभक्ती वेल्हाळपण हे नामदेवांचं व्यक्तिमत्त्वच होतं.
 ज्ञानदेवांची गौळण मनातल्या कृष्णाशी सुखसंवाद करते. त्याच्या मिलनाच्या कल्पनेत रंगते. बाललीलांतही रमते. कृष्ण खोड्यांनी कातावते. ज्ञानेश्वर गौळणीत म्हणतात,

पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगतसे॥१॥
उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाऊ
पाहणे पंढरी राऊ घरा कै येती॥२॥

 हे सांगताना ते म्हणतात, तुझ्या पायात सोन्याचे तोडे घालीन, तुझ्या तोंडी दहीभाताची उंडी देईन. दुधे भरली वाटी तझ्यासमोर ठेवीन. इतकेच काय पण रसाळ फळाची आंब्याची डहाळी तुझ्यासमोर ठेवीन

आंबया डाहाळी फळे चुंबी रसाळी
आजिचेरे काळी शकुन सांगे॥
ज्ञानदेव म्हणे जाणिज ये खुणे
भेटती पंढरी राणे शकुन सांगे।

 पंढरीरायाला भेटायला झालेली ज्ञानदेवांच्या जिवाची तगमग या गौळणीमधून दिसते. म्हटली तर ही विरहिणी आहे. जिवाची परमेश्वरभेटीची तळमळ इतकी वाढत जाते, की मग तो परमेश्वर येऊ लागल्याची लक्षणे दिसू लागतात, भासू लागतात.

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु।
मी म्हणे गोपाळु आला गे माये।
चांचरती चांचरती बाहेर निघाले।
ठकचि मी ठेले काय करू ॥१॥
मज करा का उपचारू, अधिक ताप
सखिये सारंग धरू भेटवा कां॥धृ॥

 ज्ञानदेवांचे सगळे प्राण त्या विठ्ठलानं बांधून घेतले आहेत. सगळीकडे ते सावळे पितांबर नेसलेले रूप दिसत आहे; पण अजून ते भेटत नाही.

बंधोनि ठेले मन तव जालें आनेआन
सोकोनि घेतले प्राण माजे गे माये

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १३०॥