Jump to content

पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आलीया मरिबाई॥
आलीया मरिबाई
नीचळ सोनियाची
गावाला ताकीद
ईच्या आंबील बोणीयाची॥
कापूर हिल्लाळ जगती
त्याच्या ज्योती ज्योती
जटेची मरिबाई
तिच्या पूजेला गर्दी होती॥

 अशी गीते पोतराज गात. त्यांच्या गीतात मरिआईचा महिमा गुंफलेला असायचा. शाहू महाराजांनी तिची पूजा केली, पायघड्या घातल्या, असे वर्णनही एका पोतराज गीतामध्ये आढळते.

देवामधी देव पोतराजा बळी
त्याची वनामधी माळीगं कन्या बारूलां
देवामधी देव पोतराज मोठा
त्याच्या वनामधी गोठा कन्या बारूला
बारूबाई तुझी पोतराजावर पिरती
नांदे सुखानं धरती गं कन्या बारूला
बंधू पोतराजा राखण राखे गाव
तुझ्यासंगं त्याचं नाव गं कन्या बारूला

 अशा काही गीतांमधून पोतराजाचाही महिमा डोकावतो. तो देवीचा भक्त असल्याने गावाची रदबदली तो देवीजवळ करतो. देवीला प्रसन्न ठेवतो. तिचा कोप होण्यापासून गावाला वाचवतो म्हणून मग 'बंधू पोतराजा राखण राखे गाव' असं वर्णन गीतामध्ये येतं.
 पोतराज स्त्रीरूप धारण करतो त्यामुळे त्याच्या बऱ्याचशा गाण्यात ओवी रचना आढळते. त्याचं गीतातून व्यक्त होणं, हे स्त्री मनाचा आविष्कार वाटतं. त्याची सगळी गाणी मरिआईचीच नाहीत, तर इतरही काही भक्तिरचनाही त्याच्या गीतात आहेत. लोकमानसात अशा गीताचे एक चमत्कारिक मिश्रण आढळतं. मग वाघ्या-मुरळी असो, वासुदेव असो, गोंधळी असो काही गीतं थोडी कथेच्या अंगानं जाणारी रंजनाचं सूत्र धरणारी आढळतातच. पोतराजही त्याला अपवाद नाही. पोतराज गीतात त्यानं भिल्लीणीची कथाही सांगितली आहे. जी शंकर-पार्वती संबंधातली आहे.

सोंगट्याचा डाव गिरजा म्हणती 'आठ-नऊ'

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२४ ।।