पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेजुरीगडाचं वर्णनही काही गीतांमध्ये केले आहे.
सुवर्णाची गड जेजुरी दक्षिणात कोटं
नवखंडाचे माणूस येऊन बोलती येळकोट...
काळा किल्ला गड जेजुरी दिसे शोभिवंत
देवन तुराव वरती आहे ठाणे मजबूत

 एकेकाळी समृद्ध असणाऱ्या मल्हारीच्या या जेजुरीचे वर्णन 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' असे केले गेले आहे.
 मल्हारीचे लग्नाचा सोहळा कसा पार पडला, कोणते प्रसंग कोठे घडले, याचे वर्णनही एका गीतामध्ये येते. यात लग्न सुपे परगण्यात लागले, हळद शिंगणापुरात, लग्नाचे बाहुले चाळीसगावात अशी वेगवेगळ्या गावांच्या नावाची गुंफण केलेली दिसून येते.

 जी-जी काही खंडोबाची ठाणी आहेत, तिथल्या प्रादेशिकतेचे अनुरोधाने वेगवेगळे भाषिक संस्कारही या वाघ्या-मुरळी गीतावर आढळतात. कोणा बापू वाघ्या, धोंडू-ग्यानू, शंकर वाघ्या, बाळाकृष्ण, मुकिंदगुरूचा चेला, मल्ल वाघ्या अशा रचनाकारांनी ही गीतं लिहिली आहेत. खूपशी गीतं वेगवेगळ्या संशोधकांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे नवीन पिढीतील संशोधकांना त्याचा फायदा होणार आहे; पण काही गीते कदाचित काळाच्या ओघात शब्दबद्ध करण्याची राहूनही गेली असतील. आजही खंडोबा आणि जोतिबा ही कुलदैवते असणारी कुटुंबे दरवर्षी यात्रांना जातात. देव्हाऱ्यात या दैवतांची पूजा नित्यनेमाने करतात. मनातला भक्तिभाव पिढ्यान्पिढ्या अजूनही त्याच तन्मयतेने व्यक्त करतात, त्यामुळे मल्हारीचा यळकोट लोकमानसात चिरंजीव आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११८ ॥