Jump to content

पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खंडोबा आणि बानाई यांच्यामधला एक नाजूक प्रसंगही एका शाहिरानं गीतात वर्णिला आहे, तो म्हणतो,

मुख दावून बानू गं गेली।
स्वारी देवाची गं वेडी झाली जी॥
एकदा मध्यान्हीच्या अमलात,
देव मल्हारी निद्रागत,
बानू नार आली शयनागारात,
हिनं उशाला मांडी ग दिली।
स्वारी देवाची ग वेडी झाली॥
ह्या ग बानू नारीचं अंग,
जसं चमके ऐनाचं भिंग
देव मल्हारी झाले दंग

 बानूच्या नादानं वेडावलेला मल्हारी साहजिकच म्हाळसेला काही काळ विसरल्यासारखा होतो. त्याचे तिच्याकडे जाणे कमी होते आणि मग त्याच्या विरहाने आणि त्याचबरोबर बानाईवर जडलेल्या त्याच्या प्रेमाने म्हाळसा कासावीस होते आणि ती म्हणते,

कुठं नाही रे पडलं उणं
एकाएकी झालासी रे बैमान,
फार मन केलं रे कठीण,
नारा कसं रे बाणूनं लावलं वेड
देवा मल्हारी, सोडिला गड॥

 म्हाळसेची सैरभैर अवस्थाच शाहिरानं या गीतातून व्यक्त केली आहे. कथा, नाट्य, नृत्य याचा विलक्षण मिलाफ संगतीला तुणतुणं घोळ यासारखी वाद्यं यामुळे जागरणाच्या वेळी श्रोतृवर्ग तल्लीन करण्याची ताकद या गीतामध्ये आढळते. साधी-सोपी शब्दरचना असल्यामुळे सर्वसामान्यांना ती सहज कळत असे.
खंडोबाच्या यात्रेला काही भक्त गावातून काठी घेऊन जात. या मोठ्या काठ्या मोठ्या भक्तिभावाने मिरवत ते नेत.

देवाची घाटी कशी वाजली
भक्ताची काठी कशी चालली

 असं म्हणत ते काठी घेऊन जेजुरीला जात. याची काही गीते आढळतात.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११७ ॥