पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या मुरळी गीतामध्ये बानू आणि म्हाळसाच्या भांडणात मल्हारी हसतो आहे. वास्तविक दोघींचेही मल्हारीवर अतोनात प्रेम आहे. त्याचप्रमाणे नकळत जेजुरी आणि पंढरपूर इथले तुलनात्मक वर्णन केले आहे. पंढरीत रखुमाई आहे, तर जेजुरीत म्हाळसा-बानाई आहेत. तिथे विटेवर पांडुरंग उभा, तर इथे घोड्यावर 'खंडोबा' म्हणजे मल्हारी आहे. तेथे पंढरपुरात पांडुरंगभक्त पुंडलिक आहे, तर जेजुरीतही खंडोबावर निष्ठा ठेवणारा हेगडी प्रधान आहे. तिथे आबीर बुक्क्याला महत्त्व आहे, तर जेजुरीत भंडाऱ्याला. तिथे चंद्रभागा वाहते आहे, तर खंडोबा शिवाचा अवतार असल्यामुळे प्रत्यक्ष त्याच्या मस्तकी गंगा आहे. पंढरीत मृदंग-टाळाच्या साथीत अभंग गात भक्त तल्लीन होतात, तर इथे वाघ्यामुरळीच्या नृत्यात. मुरळीच्या आयुष्याबद्दल पाहिले, तर देवदासीसारखीच तिची अवस्था. देवाशी लग्न लावायचे आणि इतरांच्या वासनेला बळी पडायचे अशी स्थिती. अशा वेळी नाथांनी मुरळीवर लिहिलेले भारूड तिनं कसं असावं याचं रूप स्पष्ट करते.

नि:संग मुरळी झाले। या मालुचे घर रिघालें।
गळा भक्तीची भांडारी। भावाचा कोटंबा करीं।
विवेकाची मागते मी वारी। या संतांच्या चौंधा आलें।
चौहात घांट वाजती। सोहं शब्द घोळ गर्जती।
वाघ्या-मुरळी या नाचती। गुरूकृपेचे अंजन ल्यालें।
वाजे वैराग्य तुणतुणं। ते कदा नव्हे बा सुनं।।
मन घुगरू वाजे छुनछुन। नाचत जेजुरी गेले॥
गड देखिला जेजुरी। आत्मा नांदतो मल्हारी।
जाऊनी बसले मी मांडीवरी। एका जनार्दनी बोले।

 देवाच्या भक्तीसाठी मुरळी नि:संग होते; पण हा नि:संगपणा देह वासनाच्या तृप्तीसाठीच जर आचरणात आला, तर त्याला अर्थ नाही. मनातला विवेक सतत शाबीत राहिला पाहिजे. वैराग्याचा अर्थ ध्यानी घेतला पाहिजे. मन हे परमात्म्याच्या भेटीला आतुरले पाहिजे. मुरळीच्या मन-आत्म्यात मल्हारीच नांदला पाहिजे.

 वाघ्या-मुरळी गीतात गावोगावच्या काही वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या प्रतिभेत काही रचना केल्या आहेत आणि त्या रचनांमध्ये त्यांनी शेवटी त्यांची नावे गुंफली आहेत. डॉ. सरोजिनी बाबर संपादित 'एक होता राजा' या ग्रंथात त्यांनी बरीचशी वाघ्या-मुरळी गीते एकत्रित केली आहेत. यातली बरीचशी गीते लावणी वा शाहिरी ढंगाची आहेत-त्यात खंडोबाचे लग्न, म्हाळसा-बाणाईमधले भांडण, देवाच्या घरचा दसरा-दिवाळी सण, सोमवती यात्रेचे गीत. अशा वेगवेगळ्या विषयांच्या अनुरोधाने गीतरचना झाली आहे.

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ११६ ॥