पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ।
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।
काम-क्रोध लोभशुनी पाठी लागली वोढाळ।
कवणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ॥

 कामक्रोधादी वासनेत गुंतलो आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तळमळतो आहे. त्यात ज्ञानदृष्टी हरवली आहे, त्यामुळे दुःखात बुडालो आहे. आता या सर्वातून बाहेर पडण्यासाठी जीव तळमळतो आहे. कुणाला शरण जावे म्हणजे यातून बाहेर पडता येईल! नाथांप्रमाणे ज्ञानदेव म्हणतात. यातूनही सद्गुरूशिवाय पर्याय नाही.

कृष्णांजन एकवेळा डोळा घालिता अढळ।
तिमिर दःख गेले सुटले भ्रांति पडळ
श्रीगुरू निवृत्ती राजे मार्ग दाखविला सोज्वळ।
बापरखुमा देवीवर विठ्ठल दिनाचा दयाल।

 सद्गुरूने डोळ्यांत अंजन घालून पारमार्थिक सुखाचा खरा मार्ग दाखविला.
 ज्ञानदेवांच्या फुगडीत ते लिहितात,

फुगडी फुगे बाई फुगडी फू।
निजब्रह्म तू गे बाई परब्रह्म तूं गे।
मन चित्त धू। विषयावरी थू।
कि एक नाम मांडी। दुजाभाव सांडी।
हरि आला रंगी। सज्जनाचे संगी।
सकळ पाहे हरि। तोचि चित्ती घरी।
ज्ञानदेवा गोडी। केली संसारा फुगडी।

 यातही सर्व विषयवासनांचा त्याग करण्याचा उपदेश ज्ञानदेवांनी केला आहे. मन चित्त धूम्हणजेच ज्या काही वासना मनात वास करून देहाला त्रास देत आहेत, त्यापासून मुक्ती मिळवणे. चित्त शुद्ध करणे आणि असं चित्त शुद्ध झालं, की मग सगळा दुजाभाव आपोआप नाहीसा होईल आणि खरा परमेश्वर सामोरा येईल. हरिदर्शन घडेल, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही अद्वैताची फुगडी ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे.

घुळघुळीत वाजवी टाळ। झणझणा नाद रसाळ।
उदो जाला पाहाली वेळ। उठा वाचे वदा गोपाळ रे।
जगी जग झाले जनार्दन। उदो प्रगटला बिंबले भान रे

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०३ ॥