पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दादला मारून आहुती देईन । मोकळी कर गं मला॥६॥
एका जनार्दनी सगळेच जाऊदे। एकटीच राहू दे मला॥७॥

 संसारात होरपळणारा जीव सासरारूपी अहंकार, कल्पनारूपी सासू, इच्छारूपी जाऊ, द्वेषरूपी नणंदेचे पोर आणि अविवेकरूपी दादला या सर्वांपासून मुक्तता मिळविणेचा प्रयत्न करते आहे.  लोक ही भारुडं आनंदानं ऐकतात पण त्यातली रूपकं जाणून त्याचा अर्थ ध्यानी घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाथांनी त्यांच्या भारुडात अनेक रूपकं वापरली आहेत. त्या दृष्टीनं हे एक भांडारच आहे. एक खजिना आहे. एकनाथांच्या अगोदर भारुडाची रचना ज्ञानेश्वरांनी केली आहे. सामान्य माणसांना समजावी अशी भारुडे, अभंग, हरिपाठ वगैरे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली आहेत. एकनाथांइतकी भारुडे ज्ञानेश्वरांनी लिहिली नाहीत; पण तरीही अंबुला, सौरी, फुगडी, घोंगडी, वासुदेव, डौर, आंधळा, कापडी, बाळछंद, गोंधळ, पांगुळ अशा भारुडांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपदेश केला आहे. ज्ञानदेवांनी अंबुला भारूड लिहिले ते एकनाथांच्या दादला भारुडाशी साम्य दर्शविणारे आहे.

विचारिता देही अविचार अंबुला।
न साहे वो साहिला काय करू/
अंबुला विकून घेतली वस्तु
घराचा समस्त बुडविला।
उठोनि गेलिये अज्ञान म्हणाल
म्या तव कैवल्य जोडियेले।

 इथं अंबुला म्हणजे नवरा. हा अविचारी आहे. अशाबरोबर संसार करण्याचा जीवरूपी नारीला कंटाळा आला म्हणून तिनं त्याला बाजारात विकला. विकृतींचा घराचार तिनं बुडविला; पण हे अज्ञान सांडल्यामुळे तिला कैवल्याची प्राप्ती झाली आहे. नाथांनीही दादला' मध्ये हेच म्हणणे मांडले आहे.
 आंधळा भारुडात ज्ञानेश्वर म्हणतात, जे आयुष्य कधीतरी संपणार आहे, नाशवंत आहे त्याला एक ज्ञानदृष्टी मिळावी म्हणून ज्ञानदेवांनी याची रचना केली असावी. नाशवंत सुखाला कवटाळून बसल्यामुळे ज्ञानदृष्टी हरपली आणि मग पारमार्थिक दृष्टीने आंधळा बनलो.

पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुत विस्तारिले।
विषयसुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले।
चौऱ्यांशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिले।
ज्ञानदृष्टी हारपली दोन्ही नेत्र आंधळे।

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०२ ॥