पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ८१

 कारकून हे भटाचे पंक्तीचे आहेत. मूळ हिंदू लोकांमध्ये विद्येचे मान इतके कमी आहे की, त्यांस विद्या म्हणजे काय, हे अश्रुत आहे. जर कोणाची विद्या वर्णन करणे झाल्यास म्हणतात की, अमका केवढा शहाणा ! पत्र लिहितो ! मजकूर जुळून लिहितो. अक्षण चांगले सुंदर. आता हे काही विद्वानाचे वर्णन झाले नाही, विद्वान म्हणजे काय, ज्याची बुद्धी विशाल, ज्याने नवीन ग्रंथ ऋषीसारखे लिहावे, ते विद्वान. हल्ली गृहस्थास यातील काही ज्ञान नाही. त्यांस धर्म म्हणजे काय, याचा अर्थ पाच हजार कारकून गोळा केले आणि पुसला तर सांगू शकणार नाहीत व संध्या कशाकरिता करतात, हेही कोणास ठाऊक नाही. असे अंधारात जे लोक आहेत, त्यांस विद्येचे मूळ काय ठाऊक ?
 इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता, तर राज्य न जाते. हे भट कारकून असे मूर्ख जमा झाले. म्हणूनच हे राज्य बुडाले. विद्या पहिल्यासारखी असती, तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती; परंतु ही जनावरे पाहिजे तेथे दोरीने बांधावी अशी गरीब, म्हणून असे झाले. पुढे जरी हिंदू लोकांचे कल्याण झाले, तर इंग्रजी पंडितांचे हातून होईल, यात संशय नाही. कारकून व भट हे क्षीण झाले म्हणजे इंग्रजी विद्या वृद्धिंगत झाली म्हणजे हिंदू लोक पूर्वस्थितीवर येण्यास उशीर नाही. हल्लीचे गृहस्थ व इंग्रजी शिकणारे विद्वान यांचे वैमनस्य असण्याचे कारण असे आहे की, त्यांची यांची मते मिळत नाहीत. कारकुनास असे वाटते की, अंगरखा घालणे व गंध लावणे व आणीचा जोडा घालणे, हाच आमचा धर्म. तसे इंग्रजी विद्वानास वाटत नाही. कारण की, हे ज्ञानी आहेत. तेव्हा त्यांची मते वास्तविक आहेत. ते म्हणतील डावे हाताने गरिबास पैसा दिला, तरी सारखाच, उजवे हाताने दिला तरी सारखाच; परंतु कारकुनास वाटते की, ज्या हल्ली चाली आहेत, तोच धर्म. चाली व रीती आणि धर्म यांचा भेद त्यांस कळत नाही. चालीस व रीतीस व धर्मास सारखेच मानतात; कारण ते अक्षरशत्रू आहेत व चालीविरुद्ध कोणी बोलेल, तर त्यांस नास्तिक म्हणतात. नास्तिक म्हणजे काय, हेही त्यांस कळत नाही, परंतु ऐकीव शब्द माहीत आहेत. तसेच निर्दय म्हणण्याचे कारण असे आहे की, गरिबास व विद्वानास धर्म करावा, ते जाऊन दुसऱ्यास देणे यास धर्म समजतात. शहाणे आहेत ते तसे करीत नाहीत. म्हणून त्यांस असे वाटते की, हे निर्दय आहेत. जो विद्वान आहे, तो गरिबास धर्म करितो; परंतु ब्राह्मण, कारकून व भट यांच्या अशा समजुती आहेत की, दांडग्या व मूर्ख भटास धर्म करावा. अधर्मी म्हणतात की, यांचे कारण असे आहे की, धर्म म्हणजे काय, हे यांस ठाऊक नाही, म्हणून असे म्हणतात.