Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४०२ : शतपत्रे


पृष्ठ ३२७: इंग्लंड देशाचा वृत्तान्त काढून पाहावा
 (१) जॉन राजा (११९९ - १२१५)- 'मॅग्नाचार्टा' ही ६३ कलमी मोठी सनद त्याने जनतेला दिल्यामुळे अनियंत्रित राजसत्ता नियंत्रित झाली.
 (२) चार्लस राजा १ ला (१६२५ - १६४९)- 'राजाची ईश्वरदत्त सत्ता' या तत्त्वाच्या जोरावर त्याने मनास येईल तसा राज्यशकट हाकला. पण शेवटी वेंटवर्थ, पिम, इलियट, हॅम्पडेन यांसारख्या पुढाऱ्यांच्या हक्कांच्या मागणीच्या खलित्यावर ('पिटिशन ऑफ राईट्स') त्याला स्वाक्षरी करावी लागली (१६२८) यामुळेच पार्लमेंटशी असलेले संबंध बिघडून त्यातून युद्ध उद्भवले आणि त्यात त्याचा पराभव झाला. १६४९ मध्ये त्याला फासावर चढविण्यात आले.
 (३) जेम्स राजा २ रा (१६८५ - १६८८)- राज्यकारभार चांगला न केल्यामुळे त्याच्या राज्यातील संत्रस्त नागरिकांनी त्याचा जावई हॉलंडचा राजपुत्र विल्यम यास राजपद स्वीकारण्याचे आवाहन केले (१६८८). नंतर जेम्सने फ्रान्समध्ये पलायन केल्यावर जे सत्तांतर झाले त्यास रक्तशून्य राज्यक्रांती असे इतिहासात म्हणण्यात आले.

पृष्ठ ३२७: जेव्हा जैनमत झाले होते तेव्हा
 (इ. स. ७०० च्या सुमारास) कुमारिलभट्टांनी बौद्ध मताचे खंडन करून वैदिक धर्माची प्रतिस्थापना केली, बौद्ध व जैन तत्त्वज्ञानांच्या अतिरेकामुळे समाजावर जे संस्कार झाले होते ते वैदिक तत्त्वज्ञानाच्या पुरस्कारामुळे नष्ट झाले.

पृष्ठ ३२७: तस्मात् ती "रिवोल्युशन" म्हणावी
 शिवाजीमहाराजांनी फार मोठी क्रांती केली. त्यांनी कलियुग कल्पना नष्ट केली, हरिहर हिंदूंना पाठमोरे झाले आहेत. आपले देवच मुसलमानांना वश आहेत हा घातकी समज जनमनातून समूळ काढून टाकला; अदृष्टफलप्रधान कर्म उच्छिन्न करून टाकून 'महाराष्ट्र धर्मा' ची संस्थापना केली, पतितांची शुद्धी, परदेशगमन, समुद्रप्रवास हे नवे आचार सुरू केले. जन्मजात श्रेष्ठत्व कमी करून गुणास मोल दिले, वतनदारी मिरासदारी मोडून काढली. अशा अनेक नव्या गोष्टी त्यांनी केल्या. (पाहा- 'शिवछत्रपतींचे क्रांतिकार्य' हा डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा लेख- 'वैयक्तिक आणि सामाजिक कार्य' या निबंधसंग्रहामध्ये.)