Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९८ : शतपत्रे

पृष्ठ २५८: पूर्वी हिंदू लोक सीथिया देशातून हिंदुस्थानात आले
 पूर्वी भारतात उत्तर आशियातील अनेक भटक्या टोळ्या आल्या. त्यातील एक टोळी ही सीथियन होती.

पृष्ठ २६१: पुनर्विवाह हिंदू लोकांचे सुधारणेचे मूळ आहे
 पुनर्विवाहविषयक खल अव्वल इंग्रजीत बाळशास्त्री जांभेकरांपासूनच सुरू झाला होता. त्यांनी १८३७ सालच्या 'दर्पण'च्या काही अंकांत (१८ ऑगस्ट, ८ व १५ सप्टेंबर १८३७ च्या अंकात) या विषयावर तीन लेख लिहून व अन्य प्रस्तावना वगैरे लिहून एतद्विषयक अनुकूल मतप्रदर्शन केले होते. (पाहा - बाळशास्त्री जांभेकर ग्रंथ, खंड २रा. संपादक- ग. गं. जांभेकर, पृ. १३०-१३५ व २९३). यावरून पुनर्विवाहात सुधारणेचे मूळ आहे हे त्या काळात कसे प्रतीत होऊ लागले होते हे स्पष्ट होते. पुढे पुनर्विवाह प्रकरण चांगलेच धसाला लागले होते, हे त्या काळातील गाजलेल्या पुनर्विवाहावरून व विष्णुशास्त्री पंडितांसारख्यांनी केलेल्या वादावरून सहज लक्षात येते. (अधिक माहितीसाठी लोकहितवादी व न्या. रानडे यांची चरित्रे पाहा.)

पृष्ठ २६४: इंग्लंडातील थोरली सनद
 इ. स. १६८८ मध्ये इंग्लंडमध्ये रक्तविहीन राज्यक्रांती होऊन इ. स. १६८९ मध्ये ३रा विल्यम व मेरी ही अधिकारारूढ झाली. त्या वेळी त्यांच्याकडून भाषणस्वातंत्र्य, निर्वाचनस्वातंत्र्य, राजावरील पार्लमेंटचे नियंत्रण इत्यादी कलमे असलेली एक हक्कांची सनद (Declaration of Rights) पार्लमेंटने संमत करून घेतली व तिला पुढे कायदेशीर रूप दिले. यासच (इंग्लंडातील) हक्कांची सनद असे म्हटले गेले.

पृष्ठ २६४: फराशीस यांची राज्यक्रांती
 १६ व्या लुईच्या कारकीर्दीत इ. स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय असंतोषाचा उद्रेक एका मोठ्या राज्यक्रांतीच्या रूपाने झाला. या क्रांतीच्या वेळीच 'स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व' या तत्त्वत्रयींचा उद्घोष प्रथम केला गेला आणि परिणामी राज्यसत्ता संपुष्टात येऊन लोकसत्तेचा उदय झाला.