Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३९९

पृष्ठ २६४: रूमचे राज्याचा नाश
 इ. स. १४५३ मध्ये रोमन साम्राज्याच्या राजधानीवर- कॉन्स्टॅटिनोपलवर तुर्कांनी धाड घातली तेव्हा रोमन सत्ता लयास गेली आणि त्याबरोबरच मध्ययुगाची- तमोयुगाची इतिश्री झाली. याप्रमाणे १५ व्या शतकाच्या मध्यावर रोमन साम्राज्याचा शेवट झाला असला तरी ४थ्या, ५ व्या शतकापासूनच ही प्रक्रिया चालू झाली होती.

पृष्ठ २६५: अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती
 १४९२ साली अमेरिकेचा शोध लागला. ६ वा एडवर्ड व मेरी ट्यूडर यांच्या कारकीर्दीत ज्यांचा छळ झाला त्यांनी मग तेथे जाऊन वसाहत केली. पुढे एलिझाबेथच्या काळात व्यापारामुळे वसाहतीत वाढ झाली व अनेक इंग्रज तेथे जाऊन राहिले. पुढे स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स येथील लोकांनीही तेथे जाऊन वसाहती केल्या.

पृष्ठ २६८: शास्त्रास एकीकडे ठेवा... विचार करून पाहा
 अंधश्रद्धेची कास सोडून बुद्धीची- विवेकाची कास धरण्याचा हा आग्रह म्हणजे इंग्रजांच्या आगमनामुळे झालेल्या युगांतराचा परिपाक होय. 'अव्वल इंग्रजी' मधील नवशिक्षितांनी एकसारखा असा आग्रह धरलेला दिसतो. "शोध व विचार यापासून उपयोगी फले होतात.. प्रतिघटका नवे ज्ञान काहीतरी माहीत करून देतात" (दर्पण - २ मार्च १८३२), "ईश्वराने आपणास बुद्धि दिली आहे तिच्या योगाने विचार करावा" (हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध- पुरवणी - बाबा पदमनजी), यांच्यासारख्या विधानांवरून हेच दिसून येते.

पृष्ठ २८५: तुम्ही मंडळी स्थापन केली याचा मला संतोष आहे
 लोकहितवादींनी 'कल्याणोन्नायक मंडळी' वर टीका केली असली तरी विशिष्ट मर्यादेपर्यंत तिचा गौरवपूर्वक उल्लेखही त्यांनी केलेला दिसतो. यावरून लोकहितवादींची टीका वैयक्तिक नसून तत्त्वमूलक कशी होती, हे उघड होण्यास प्रत्यवाय नाही.